
‘माझ्या संस्कारांबद्दल काहीही बोलाल तेव्हा लक्षात ठेवा’
'या' अभिनेत्रीने शक्तिमानला सुनावले, इन्स्टाग्राम स्टोरीतून दिले उत्तर, पोस्ट वाचाच
मुंबई – छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका शक्तिमानचा हिरो मुकेश खन्ना नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतो. आताही तो पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. कारण मुकेश खन्ना यांनी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर टिका केली आहे.
मुकेश खन्ना यांनी नुकताच सिद्धार्थ कन्ननबरोबर संवाद साधला. यावेळी तो म्हणाला की, “आजच्या मुलांना मार्गदर्शनाची खूप गरज आहे. नव्या पिढीतील मुले भरकटत आहेत. गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंडसोबत फिरत राहते. आजची मुले इंटरनेटमुळे भरकटत आहेत. त्यांना आजी-आजोबांची नावेही आठवत नाहीत. एका मुलीला तर हनुमानाने संजीवनी बुटी कोणासाठी आणली होती हेसुद्धा माहीत नव्हते आणि ती मुलगी शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आहे. तिच्या अपूर्ण माहितीसाठी तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा जबाबदार आहेत. तिच्या भावांची नावे लव आणि कुश आहेत आणि तिच्या घराचे नाव रामायण आहे, तरीही तिला रामायणाचे ज्ञान नाही.” यावर सोनाक्षीने पलटवार केला आहे. ती म्हणाली की, ”प्रिय सर, मुकेश खन्ना जी… मी तुम्ही नुकतंच केलेलं वक्तव्य वाचलं. खूप वर्षांपूर्वी मी एका कार्यक्रमात रामायणसंदर्भातील प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकले नाही, ही माझी नव्हे तर माझ्या वडिलांची चूक आहे, असं तुम्ही म्हणालात. मी तुम्हाला आठवण करून देते की त्या दिवशी हॉट सीटवर दोन महिला होत्या, ज्यांना त्याच प्रश्नाचं उत्तर माहीत नव्हते, पण तुम्ही फक्त माझे नाव घेता, त्याचं कारणही स्पष्ट आहे. प्रभू श्रीराम जर मंथराला माफ करू शकतात, कैकेयीला माफ करू शकतात आणि युद्ध झाल्यानंतर रावणालाही माफ करू शकत असतील तर तुम्हीही ही अत्यंत छोटी गोष्ट विसरू शकता.”, असं म्हणत तिने प्रत्युत्तर दिले आहे.
सोनाक्षीने २०१९ मध्ये केबीसी या शोमध्ये हजेरी लावली होती. शोमध्ये तिला ‘हनुमानाने संजीवनी बुटी कुणासाठी आणली होती?’ असा प्रश्न विचारला. त्याचे चार पर्याय सुग्रीव, लक्ष्मण, सीता आणि राम हे होते. सोनाक्षीला उत्तर आलं नाही, त्यामुळे तिने लाइफलाइन वापरली होती.