
वाल्मिक कराड प्रकरणात संध्या सोनवणेंची चाैकशी कशासाठी?
कोण आहेत सोनवणे? म्हणाल्या राजकारणात काम करताना अनेक व्यक्तींशी संबंध येतात परंतु...
बीड – बीडच्या मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात अनेक नेत्यांची आणि व्यक्तींची नावे समोर येत आहेत. यातच आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे यांची सीआडीकडून चौकशी करण्यात आली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
सीआयडीकडून वाल्मिक कराड प्रकरणात रविवारी संध्या सोनवणे यांची चौकशी करण्यात आली. संध्या सोमवणे या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या युवती प्रदेश अध्यक्षा आहेत. संध्या सोनवणे म्हणाल्या, जे जे अधिकाऱ्यांनी विचारलं ते विचारलं त्याची मी माहिती दिली. मी पक्षामध्ये काम करत असल्यामुळे मला तपासासाठी बोलवलं. बारा वाजता मी आले होते. जेव्हा जेव्हा प्रशासन बोलवेल त्यावेळेस मी चौकशीला हजर राहणार आहे. राजकारणात असल्यामुळे सर्वांचे संबंध येतात. वरिष्ठ नेत्यांवर जी आरोप होत आहेत त्याविषयी मी काहीही बोलणार नाही. पहिल्यांदाच अशा पद्धतीने चौकशीला मी सामोरे गेले आहे. दरम्यान संध्या सोनवणे या महाविद्यालयीन जीवनापासून सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतलं आहे. सक्रीय राजकारणात येण्यासाठी संध्या यांनी जामखेड तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली. त्यात त्या निवडून आल्या. राष्ट्रवादीत फूड पडल्यानंतर संध्या यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादीचे युवती प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आले. धनंजय मुंडे यांचे वाल्मिक कराड निकटवर्ती असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची चाैकशी केली जात आहे.
तीन दिवसांपासून सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीड जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या प्रकरणाचा सीडीआय एकत्रितरित्या तपास करीत आहे. वाल्मिक कराड यांच्यावर आरोप असल्यामुळे वाल्मिक कराड यांची पत्नी मंजली कराड यांची रविवारी पुन्हा चौकशी केली. याआधीही मंजली कराड यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते.