
पुढील पाच दिवस पाऊस महाराष्ट्राला झोडपून काढणार
हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा, वादळी वारेही वाहणार, काय आहे पावसाचा अंदाज
पुणे – मे महिन्यात धुमाकूळ घालणारा पाऊस निम्मा जुन संपत आली तरी अपेक्षेप्रमाणे बरसलेला नाही. पण आता हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभाग देखील अलर्ट झाला आहे.
महाराष्ट्र हवामान विभागाने इशारा दिला आहे की १३ आणि १४ जून रोजी कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांसाठी विशेष अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यातही पावसाबरोबर ४० ते ५० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेषतः काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. प्रादेशिक हवामान अंदाजानुसार, राज्याच्या अंतर्गत भागात कमाल तापमानात २-३ अंशांची घट होणार असून येत्या तीन ते चार दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मोसमी पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे. मोसमी वाऱ्यांनी मागील काही दिवसांपासून वाटचाल केलेली नाही. पण आता मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे एक ते दोन दिवसांत मोसमी वारे विदर्भातील काही भागात प्रगती करतील. तसेच छत्तीसगड आणि ओडिशातील काही भागातही मोसमी वारे वाटचाल करतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात सध्या २ हवामान प्रणाली सक्रिय आहेत. तामिळनाडूपासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत एक ट्रफ लाईन तयार झाली आहे. उत्तर ओडिशा आणि आसपासच्या भागात चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत, जे आता दक्षिण महाराष्ट्राकडे सरकत आहेत. या दोन्ही हवामान प्रणालींच्या प्रभावामुळे राज्यात पावसाचा कालावधी सुरू होणार आहे.
हवामान विभागाने प्रशासनाला संभाव्य पूर, पाणी साचणे आणि इतर आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे. नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा आणि पावसाशी संबंधित सूचनांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आणि हवामान अंदाजानुसार काम करण्याचे आवाहन केले आहे.