
उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा की नाही हे त्यांनी ठरवावं – एकनाथ शिंदे , महाराष्ट्र राजकारणात मोठी उलथापालट ?
उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा की नाही हे त्यांनी ठरवावं – एकनाथ शिंदे
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. त्यांची समजूत घालण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३० पेक्षा जास्त आमदार असून ते सध्या आसाममधील गुवाहाटी येथे आहेत. एकीकडे राजकीय तर्कविर्तक लावले जात असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी “आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते आहोत”, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते ‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीशी बोलत होते.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“आम्ही सर्व आमदार आता एकत्र आहोत. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते आहोत. आम्हा सर्वांची तीच भावना आहे. आमच्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त आमदारांचे संख्याबळ आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाविषयी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा की नाही याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. आम्ही पुढची दिशा ठरवण्यासाठी संध्याकाळी एक बैठक आयोजित केली आहे. ती बैठक झाल्यावर तुम्हाला त्याचा निर्णय कळवला जाईल”, असे ते म्हणाले. शिवसेना आमदाराला मारहाण झाल्याचा दावा केला जात असताना त्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. “गुजरातमध्ये कोणत्याही आमदारांना मारहाण केली नाही. त्यांना परत पाठवताना कार्यकर्तेही त्यांच्या बरोबर दिले होते”, असेही ते म्हणाले.