
राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी उत्खननाच्या परवानग्या घेतल्या का, रॉयल्टी भरली का अशी विचार करुन कंपनीला दंडात्मक कारवाई करायची नसेल़ तर 2 कोटी रुपये द्यावे लागतील, नाही तर माहिती अधिकाराखाली माहिती घेऊन कोर्टात दावा दाखल करु अशी धमकी देणार्याला व खंडणी घेण्यासाठी आलेल्या आरोपीला खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून पकडले. दत्तात्रय गुलाबराव फाळके (वय 46, रा. मानसिंग रेसिडेन्सी, तळजाई पठार, धनकवडी) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी कोंढव्यातील 30 वर्षीय व्यक्तीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय फाळके हा माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करतो. त्याने फिर्यादी यांना वारंवार फोन करुन फिर्यादीच्या कंपनीचे अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील आढळगाव येथे चालू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे कामाबाबत उत्खनन करता त्याच्या परवानग्या घेतल्या का, रॉयल्टी पेमेंट केले का अशी विचारणा करुन तुमच्या कंपनीला दंडात्मक कारवाई करायची नसेल, व्यवस्थित काम करायचे असले तर तुम्हाला 2 कोटी रुपये द्यावे लागतील. नाही तर तुमच्या हायवेचे कामकाजाबाबत माहिती अधिकाराखाली माहिती घेऊन कोर्टात दावा दाखल करु. तुम्हाला त्रास देणार, तुम्हाला ही जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादी यांनी याची तक्रार खंडणी विरोधी पथकाकडे केली.
पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेटकडून कात्रजकडे जाणार्या सातारा रोडवरील कात्रज येथील कदम प्लाझा येथे सापळा रचण्यात आला. वर 2 हजार रुपयांची नोट ठेवून बाकी 1246 डमी नोटांचे 2 बंडल तयार करण्यात आले. 25 लाख रुपयांची बंडल देण्यासाठी तयार केले गेले. मंगळवारी दुपारी पावणेचार वाजता दत्तात्रय फाळके हा ही 25 लाखांची खंडणी घेण्यासाठी तेथे आला असताना पोलिसांनी त्याला पकडले.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक,अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे,सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक- 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे,सहाय्यक निरीक्षक चांगदेव सजगणे, उपनिरीक्षक मोहन जाधव, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार विजय गुरव, शैलेश सुर्वे, प्रदिप शितोळे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, सैदाबा भोजराव, संग्राम शिनगारे, अमोल पिलाने, प्रदिप गाडे, चेतन शिरोळकर, किशोर बर्गे, रवि संकपाळ, रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.