
रायगड : मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारने काढलेल्या अध्यादेशाला 9 फेब्रुवारीला पंधरा दिवस पूर्ण होणार आहे. त्यामुळे या अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्यास 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. आंतरवाली सराटीमध्येच हे आंदोलन होणार असल्याचं जरांगे म्हणाले आहे. आमचं आंदोलन अजूनही संपलेलं नाही. जोपर्यंत सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा लाभ मराठा समाजाला होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा देखील जरांगे म्हणाले आहे. मराठा समाजाच्या फायद्यापुढे आम्ही दुसरे काही सहन करणार नाही.
सगेसोयरेबाबत करण्यात आलेल्या कायद्याची अमलबजावणी करण्यासाठी मी खंबीर आहे. काही ठिकाणी काही दस्तऐवज सापडत नाही असे सांगितले जात आहेत. ज्यांचा विरोध होत आहे, त्यांच्यासाठी हा कायदा नाही. गरजवंत मराठ्यांसाठी हा कायदा आहे. त्यामुळे विचारवंतानी या कायद्यासाठी मत मांडावे. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही. गैरसमज करून घेवू नका. विशेष अधिवेशन बोलावून कायदा पास करावा. तसेच, 9 फेब्रुवारीपर्यंत नवीन अध्यादेशाची अमलबजावणी न झाल्यास 10 फेब्रुवारीला पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.