पुण्याच्या पोर्शे अपघातप्रकरणातील अल्पवयीन आरोप वेदांत अग्रवाल याला बालहक्क न्याय मंडळा जामीन मंजूर करताना अपघातावर निबंध लिहायला सांगितले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ शेअर करत, ‘याला निबंध लिहायची शिक्षा का नाही?’ असा प्रश्न पोलीस प्रशासनाला केला आहे.
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांतने 19 मे रोजी पहाटे 3च्या सुमारास कल्याणीनगर परिसरात आपल्या भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडले. मद्यधुंद वेदांतने (वय वर्ष 17) सुमारे 200 च्या स्पीडने गाडी चालवत दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुण-तरुणीला जोरदार धडक दिली. ज्यामध्ये त्या दोघांचाही मृत्यू झाला. अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा असे या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या अपघातात दोघांचा जीव गेल्यानंतरही वेदांतला 15 दिवस वाहतूक पोलिसांबरोबर काम करण्याबरोबरच केवळ 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगून बालहक्क मंडळाने जामीन दिला होता.
बालहक्क न्याय मंडळाच्या या निर्णयावर सर्वथरातून टीका झाली. त्यामुळे पोलिसांनी बालहक्क न्याय मंडळासमोर पुनर्विचार याचिका दाखल केली. त्यावर या मंडळाने वेदांत अग्रवालचा जामीन रद्द केला आणि वेदांतची रवानगी 4 जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी केली.हाच संदर्भ देत जितेंद्र आव्हाड यांनी एका व्हिडीओद्वारे वाहतूक पोलिसांवर टीका केली आहे. चावीची मागणी करत दोन वाहतूक पोलीस एका तरुणाला मारहाण करत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसते. यावर जितेंद्र आव्हाड यांनी टिप्पणीही केली आहे. झाली असेल काहीतरी चूक यांच्याकडून. पण मग यालाही निबंध लिहायची शिक्षा का देत नाही. भर रस्त्यात मारहाण कशासाठी? असा प्रश्न विचारत, हा गरीब घरातला पोरगा दुचाकीवर होता पोर्शेमध्ये नव्हता, हीच या पोराची चूक असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.