
केंद्र सरकारने तीन नवीन फौजदारी कायदे संमत केले आहे. त्याची अंमलबजावणी 1 जुलै 2024 पासून करण्यात आली आहे. या कायद्यामध्ये पोलीस तपासाची कार्यप्रणाली व प्रक्रियामध्ये काही बदल झाले आहेत. नव्या कायद्यानुसार पुण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात नव्या कायद्यानुसार हा पहिला गुन्हा दाखल झाला आहे. नव्या 118(2), 115(2), 352, 3(5) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देशात आजपासून (1 जुलै 2024) तीन नवी फौजदारी कायदे लागू झाले आहेत. संसदेत नव्याने मंजूर करण्यात आलेल्या कायद्यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. जुन्या भारतीय दंड संहिता मध्ये 511 कलम होती. मात्र, नव्याने तयार करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहितेत 358 कलम आहेत. आता फसवणुकीसाठी कलम 420 ऐवजी 316 कलम वापरले जाणार आहे. तर खुनासाठी 302 ऐवजी 101 वापरले जाणार आहे.
सिद्धार्थ पाडोळे, सिद्धेश भोसले, बाळा व त्याचा एक साथीदार यांच्यावर भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस) 2023 चे कलम 118(2 (प्राणघातक शस्त्राने गंभीर दुखापत), 115(2 इच्छापुर्वक दुखापत पोहचवणे), 352 (शांतता भंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे), 3(5) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अक्षय सुरेश तुपे (वय-32 रा. साई कॉर्नर, कॅनोल रोड, वारजे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय तुपे सोमवारी (दि.1) मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास कॅनॉल रोडवरील एका पानटपरी जवळ मित्रासोबत बोलत उभे होते. त्यावेळी त्यांच्यापासून काही अंतरावर उभे असलेल्या आरोपींनी कठीण वस्तूने डोक्यात पाठीमागे मारले . तसेच रोडवर पडलेल्या सिमेंटच्या ब्लॉकने व हाताने मारहाण करुन जखमी केले. तसेच अशील शिवीगाळ करुन मारहाण केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.