
…तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला तयार आहे
वाल्मिक कराड सीआयडीला शरण, व्हिडीओत मांडली भुमिका, म्हणाला द्वेषापोटी माझे नाव...
पुणे – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणातील मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सूत्रधार असल्याचा आरोप केलेला वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडीसमोर शरण आला आहे. त्यामुळे आता तपासाला गती मिळणार आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराड याच्या या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीनी केला होता. त्याला अटक करावी यासाठी काही दिवसापूर्वी बीड मध्ये सर्वपक्षीय मोर्चा देखील काढण्यात आला होता. वाल्मिक कराड याचा संबंध हा मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जोडला गेल्याने या विषयाची चर्चा जोरदार सुरु होती. कराड यांने शरण जाण्यापुर्वी एक व्हिडीओद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. कराड म्हणाला की, केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मी सीआयडी ऑफिस पुणे येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी, फाशी द्यावी. राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्याच्याशी जोडले जात आहे. पोलीस तपासात जर मी दोषी दिसलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला तयार आहे. दरम्यान सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे आहे. सीआयडी आणि पुणे पोलिसांची पथक वाल्मिक कराडच्या मागावर आहेत. बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी त्याच्या अटकेची मागणी लावून धरली आहे. वाल्मिक कराडवर खंडणीखोरीचे सुद्धा आरोप झाले आहेत.
बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड अखेर सीआयडीला शरण आला आहे. आता सीआयडी त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर करणार आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन २३ दिवस उलटले आहेत. या प्रकरणातही वाल्मिकी कराडचे नाव घेतले जात आहे. त्यानुषंगानेही चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.