
राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे राजीनामा देणार?
वाल्मिक कराड प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत, महायुतीची पहिली विकेट?
पुणे – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडवर आरोप करण्यात येत आहेत. तब्बल २३ दिवसांनी वाल्मिक कराडने पुण्यात शरणागती पत्करली. त्याला १५ दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र त्यानंतर विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे कोणत्याही क्षणी राजीनामा देण्याची शक्यता आहे.
अनेक दिवसापासून फरार असलेला वाल्मिक कराड हा मंगळवारी पुण्यात गुन्हे अन्वेषण विभागाकडे शरण आला. वाल्मीक कराड याच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. मात्र कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. देशमुख कुटुंबीयांनी तशी न्यायालयात याचिका केली आहे. कराड आणि धनंजय मुंडे यांचे व्यावसायिक भागीदार आहेत. शिवाय कराड हे मुंडे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. मुंडेंनीही कराड हे आपले निकटवर्तीय असल्याची कबुली दिली आहे. धनंजय मुंडे महायुती सरकारमध्ये मंत्री असल्याने कराड याची दबावाशिवाय पोलीस चौकशी होणार नाही. मंत्र्याचा पोलीस प्रशासनावर दबाव राहणाराच. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी मुंडे यांचा राजीनामा आवश्यक आहे. अशी मागणी विरोधकांनी केली आहे. मुंडेंच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा आणि पालकमंत्रीपद देऊ नये या प्रमुख मागण्या विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही लावून धरल्या. आता वाल्मिक कराडच्या शरणागती नंतरही धनंजय मुंडे यांच्याविरोधातला रोष कमी होताना दिसत नाही. त्यामुळे त्यांचं मंत्रीपद धोक्यात आलं आहे. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात कुणाचाही दबाव खपवून घेणार नसल्याचे म्हणत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाल्मिक कराडवर कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. पण राजीनाम्याची मागणीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य टाळले आहे.
३० डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्री धनंजय मुंडे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेऊन चर्चा केली होती. त्याच्या दुस-याच दिवशी कराड शरण आल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचा अधिकार हा अजित पवार यांचा आहे. पण त्यांच्या माैनामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.