
शिक्षक दांपत्याची कालव्यात उडी मारून आत्महत्या
रस्त्यावरील वादानंतर दोघांनीही घेतला टोकाचा निर्णय, वर्षभरापुर्वीच झाले होते लग्न
पुणे – कौटुंबिक ताणतणावातून जुन्नर तालुक्यातील वारूळवाडी येथील डिंभा डावा कालव्यात उडी मारून एका दांपत्याने आत्महत्या जकेली आहे. या घटनेमुळे वारुळवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
चिराग चंद्रशेखर शेळके व त्यांच्या पत्नी प्रा.पल्लवी असे आत्महत्या केलेल्या शिक्षक दांपत्याचे नाव आहे. चिराग शेळके यांनी नारायणगाव येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गणित विषय शिकवत होते. तर पल्लवी या पुणे येथील एका नावाजलेल्या महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या.चिराग व पल्लवी यांचा एक वर्षांपूर्वी विवाह झाला होता. काल सायंकाळी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर दोघांनी एकत्रच कालव्यात उडी मारली. असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यावेळी काहींनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. पण पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने काही क्षणात ते दिसेनासे झाले. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचा शोध घेण्यास सुरूवात केली. चिराग शेळके यांचा मृतदेह बुधवारी रात्री शोधण्यात यश आले. मात्र अंधार पडल्याने प्रा.पल्लवी यांचा मृतदेह सापडला नव्हता. आज सकाळी पल्लवी यांचा मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आला.
दांपत्याने आत्महत्या करण्यामागील कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिस पाटील भुजबळ यांनी सांगितले आहे. आज सायंकाळी चार वाजता त्यांच्या पार्थिवावर येथील वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.