
मुलाच्या लग्नाची तयारी सुरु असतानाच आई वडिलांची आत्महत्या
नातलगांसोबत हसतखेळत जेवणही केले, पण रात्री घेतला टोकाचा निर्णय, हळहळ व्यक्त
नाशिक – नाशिकमधील टिळकवाडी भागात एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. पोटच्या मुलाच्या लग्नाची तयारी सुरू असताना आई-वडिलांनी विष घेऊन आत्महत्या केली आहे. टिळकवाडी येथील यशोकृपा बंगला येथे ही घटना घडली आहे.
जयेश रसिकलाल शहा व रक्षा जयेश शहा अशी आत्महत्या केलेल्या दांपत्याचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा दांपत्याच्या लहान मुलाचे या महिन्यात लग्न आहे. त्यानिमित्त घरी नातेवाईंकांसाठी जेवणाचा बेत करण्यात आला होता. जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर मोठा मुलगा कामानिमित्त घराबाहेर गेला, तर धाकटा देवदर्शनासाठी गेला होता. रात्री उशीरा रक्षा शहा यांनी मोठ्या मुलाला फोन केला. मात्र त्या बोलताना अडथळल्या. त्यामुळे मोठ्या मुलाने रात्री घरी जाऊन पाहणी केली असता दोघे बेशुद्ध अवस्थेत आढळूून आले. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांनी शहा दांपत्याच्या खोलीची तपासणी केली पण संशयास्पद कोणतीही वस्तू किंवा आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळली नाही. नातलगांकडे पोलिसांनी चौकशी केली असून, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कुटुंबात आनंदी वातावरण असल्याने शहा दाम्पत्याने अचानक आत्महत्या का केली, हा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे. लग्नाची तयारी सुरू होत असतानाच आई-वडिलांनी टोकाचे पाऊल उचलल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.