
धुमाकूळ घालणाऱ्या टक्कल व्हायरसचे धक्कादायक कारण समोर
यामुळे लोकांना पडत आहे टक्कल, तपासाअंती अनेक गोष्टींचा उलगडा, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का?
बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगाव, हिंगणा, वैजनाथ आणि घुई गावांमध्ये अनेक लोकांना टक्कल पडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. वाढत्या तक्रारींची दखल घेऊन आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले. त्यानंतर वेगळेच कारण समोर आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगावातील आणि खातखेड येथील पाण्यात नायट्रेटसारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. तर पाण्याची टीडीएस लेव्हलही भयंकर वाढली असल्याचे या पाण्याच्या तपासणीत उघड झाले आहे. गावकऱ्यांसाठी हे पाणी वापरणे विष ठरतं आहे. खारपाण पट्ट्यातील या गावात पिण्याची पाण्याची वेगळी सोय केलेली आहे, मात्र वापरण्याच्या पाण्यात नाइट्रेटसारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळल्याने हे पाणी वापरण्यायोग्य नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल आहे. त्यामुळे आता या पाण्याचा काय करायचं याविषयी आरोग्य खात्यामध्ये खल सुरू आहे. शेगांव तालुक्यातील टक्कल पडणाऱ्यांची संख्या आता १०० च्या वर पोहोचली आहे. तीनच दिवसात टक्कल पडत असल्याच्या प्रचंड तक्रारी आल्याने आरोग्य विभागाकडून शेगाव तालुक्यातील घरोघरी सर्वेक्षण सुरू केलं आहे. चर्मरोग तज्ज्ञांचे पथकही गावात दाखल झाले असून प्रथम कठोरा, बोंडगाव, हिंगणा या गावांत तपासणी सुरू केली आहे. सर्वसाधारणपणे पाण्यामध्ये असलेले नायट्रेटचे प्रमाण १०% असणे अपेक्षीत असते. पण परिसरातील पाण्याचे नमुने तपासले असता त्यात तब्बल ५४% नायट्रेट आढळून आले आहे. तसेच सर्वसामान्यपणे पाण्याती क्षारांचे प्रमाण ११० इतके असणे अपेक्षीत असते. पण गावातील पाण्याचे नमुने तपासले असता आरोग्य विभागाचे अधिकारीही चाट पडले. कारण या पाण्यात क्षारांचे प्रमाण तब्बल २१०० इतक्या मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहे. यासंदर्भात बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते यांनी सांगितले की, या जिल्ह्यातील गावांमध्ये केस आणि केसांचे आरोग्य यासंबंधी जो काही प्रकार पुढे आला त्याला गाव आणि परिसरातील पाणी कारणीभूत आहे. या गावातील पाणी पिण्यायोग्य आणि वापरण्यायोग्य नाही. असे असताना त्याच पाण्याचा वापर गावकऱ्यांकडून सुरु असल्याने त्याचे दुष्परिणाम पाहायाला मिळत आहेत.
या आजाराच्या लक्षणांचा विचार केला तर सर्वात आधी डोक्याला खाज सुटते. नंतर केस गळू लागतात. तिसऱ्या दिवशी चक्क टक्कलच पडते. त्यामुळे नागरिकांत भीती पसरली आहे. फंगल इन्फेक्शनमुळे हा आजार होत असल्याचे सांगितले जात आहे.