
पुण्यात भररस्त्यात दोन टोळीत कोयत्याने तुंबळ हाणामारी
हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल, पुण्याचा झाला बिहार?, कोयत्याची दहशत आणि दगडफेक, पहा व्हिडिओ!
पुणे – पुण्यात कायदा सुव्यवस्था ढासळल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. कोयता गँगने तर पुण्यात मागील अनेक दिवसापासून हैदोस घातला आहे. पोलीसांनी इशारा देऊनही कोयता गँगची दहशत कायम आहे. त्यातच आता पुण्यातील बिबवेवाडीत कोयत्याने भररस्त्यात एकावर वार करण्यात आले आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे, याचा व्हिडिओ समोर आला आहे.
पुण्यातील व्हायरल व्हिडीओ १७ एप्रिलचा असल्याचा बोलले जात आहे. याप्रकरणी बिबेवाडी पोलिसांनी सराईत गुन्हेगार सुरज भिसे, सुमित भिसे, आदित्य पवार, सतीश पवार यांना बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भिसे आणि पवार टोळीमधील वादातून हा कोयता हल्ला करण्यात आला. दोन्ही गटाकडून एकमेकांवर कोयते उगारून वार करण्यात आले. एक जण हा रस्त्यावर पडला, त्याला दोघे तिघे हे लाथाबुक्याने मारहाण करत होते. तर एका तरुणाला पकडण्यासाठी गेला असता त्याच्यावर कोयत्याने वार केला अन् कपडे फाटेपर्यंत मारहाण केली आहे. पोलीसांना याची माहिती मिळताच पोलीसांनी आरोपींना तात्काळ अटक केली आहे. याआधीदेखील भिसे आणि पवार गँगने दहशतवाद माजवण्यासाठी कोयत्याने मारहाण केली होती. पुणे पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केलं. कोर्टाने भिसे आणि पवार टोळीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. आरोपींना पोलीस कोठडीत देण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत. घटनेमागचं नेमकं कारण काय होतं, हे शोधण्यासाठी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिकांनी पोलिसांकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे, त्या म्हणाल्या बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भररस्त्यात दोन टोळ्यांनी परस्परांवर हल्ला करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. पुणे शहर आणि जिल्ह्यात अशा प्रकारच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही अशी स्थिती आहे. कधी कोयता गॅंग तर कधी भररस्त्यात मारामारी अशा घटना घडत असून सर्वसामान्य माणूस यामुळे हवालदिल आहे. माझी राज्याचे गृहमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया आपण राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा तातडीने आढावा घेऊन गुन्हेगारीला पायबंद घालण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात , अशी मागणी केली आहे.