
भारताचा पाकिस्तानवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत सर्जिकल एअरस्ट्राईक
पाकिस्तानात घुसत भारताने केला दहशतवाद्यांचा खात्मा, या नऊ ठिकाणी हल्ले, नावामागे हळवी भावनिकता
दिल्ली – काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात रोष वाढला होता, तसेच पाकला धडा शिकवला जावा, अशी तीव्र भावना देशातील नागरिक करत होते, आज अखेर भारतीय लष्कराने आॅपरेशन सिंदूर राबवत पाकस्थित शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यांनंतर भारताने प्रत्यत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर एअरस्ट्राइक केला आहे. भारतीय वायुदलानं आज रात्री मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या ९ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगामच्या दहशदवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. या हल्ल्यात ९० हुन अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. रात्री १.३० वाजता सुरू झालेल्या या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ प्रमुख दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. या एअर स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन यांसारख्या संघटनांच्या अड्ड्यांना लक्ष्य करण्यात आलं. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई अत्यंत अचूक पद्धतीने करण्यात आली असून, फक्त दहशतवादी केंद्रांवरच हल्ला झाला आहे. कोणत्याही पाकिस्तानी लष्करी ठिकाणाला लक्ष्य करण्यात आलेले नाही. “ऑपरेशन सिंदूर” नावाच्या या मोहिमेअंतर्गत भारताच्या तीनही सैन्य दलांनी संयुक्तपणे ही धडक कारवाई केली. दरम्यान पाकिस्तानमध्ये या हल्ल्यानंतर खळबळ उडाली आहे. अनेक दहशतवादी अड्डे रिकामी करण्यात आले आहेत. तसेच सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारताने २०१६ मध्ये सर्जिकल स्ट्राईक आणि २०१८ बालाकोट एअरस्ट्राईक केला होता. भारताने पाकिस्तानच्या भूमीवर केलेली ही तिसरी कारवाई आहे. या हल्ल्याचे पहलगाममधील मृतांच्या कुटुंबातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे, तर देशभरात भारतीय सैन्याचे काैतुक करण्यात येत आहे.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा दहशतवाद्यांनी महिलांना सोडून फक्त त्यांच्या पतींना मारलं होतं. यात एका महिलेचे तर आठवडाभरापुर्वीच लग्न झाले होते. तर एका महिलेच्या लग्नाला दीड वर्ष झाले होते. महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं होते. त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या पतींना गोळ्या झाडल्या होत्या. त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी या मिशनचं नाव ‘मिशन सिंदूर’ ठेवलं होते. त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.