
मोठी बातमी! कसोटी क्रिकेटमधील ‘विराट’ पर्वाची समाप्ती
रोहित शर्मानंतर विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, भारतीय संघातील हा खेळाडू ठरला कारण?, पडद्यामागे काय घडलं?
मुंबई – भारतीय क्रिकेट चाहत्यांना गेल्या आठवड्याभरात सलग दोन मोठे धक्के बसले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केल्यानंतर आता माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
विराटने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक भावूक पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली, ज्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. विराटने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, मला कसोटी क्रिकेटमधील बॅगी ब्लू परिधान १४ वर्ष पूर्ण झाली आहेत. खरं सांगू तर, हा प्रवास मला कुठे नेईल, याची मला काहीच कल्पना नव्हती. या फॉरमॅटने माझी कसोटी घेतली, घडवलं आणि असे धडे दिले जे इथून पुढील आयुष्यातही मला कामी येतील. त्याने पुढे म्हटले, पांढरे कापडे घालून खेळणं विशेष असतं. या फॉरमॅटपासून दूर जाण्याचा निर्णय मुळीच सोपा नव्हता, पण योग्य वाटतो. मी या खेळासाठी सर्वकाही दिलं. त्याहून अधिक या खेळाने मला परत दिलं. मी कृतज्ञतेच्या भावनेनं भरलेल्या हृदयानं या प्रवासातून बाहेर पडतोय. कसोटी क्रिकेटमधील माझा प्रवास, कायम हसत आणि अभिमानानं आठवत राहिल. कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीची बॅट गेल्या काही काळापासून शांत राहिली होती. गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वारंवार एकाच पद्धतीने बाद झाल्याने तो बराच निराश झाला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर तो विकेटच्या मागे बाद होत होता. मालिकेच्या पहिल्या सामन्यात कोहलीने शतक झळकावले असेल, परंतु त्यानंतर त्याची कामगिरी खूपच खराब होती. या मालिकेत भारताला १-३ असा पराभव पत्करावा लागला होता. विराटने कसोटी क्रिकेट मधील निवृत्तीबाबत बीसीसीआयला कळवलं आहे असेही समोर येत होत, मात्र तू पुन्हा एकदा याबाबत विचार करत अशी विनंती बीसीसीआयने कोहलीला केली होती. परंतु विराट त्याच्या निर्णयावर ठाम राहिला आणि अखेर आज त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली निवृत्ती जाहीर केली. विराट कोहलीच्या या निर्णयामुळे भारतीय क्रिकेटला तर मोठा फटका बसला आहेच, पण त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. दरम्यान टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्माने कसोटीमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट नाही तर शुबमन गिलला बीसीसीआय भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिलं जात आहे. पण विराट कोहलीने पुन्हा एकदा भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, बीसीसीआयने यावर कोणताही विचार केला नव्हता. याचे कारण असे की त्यांना पुढील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा पाहता पूर्णवेळ कर्णधार हवा होता.
विराट कोहलीने आपल्या १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत १२३ कसोटी सामने खेळले आणि ४६.८५ च्या सरासरीने ९,२३० धावा केल्या. यामध्ये ३० शतके आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने भारतासाठी सर्वात यशस्वी कसोटी कर्णधारांपैकी एक म्हणूनही नाव कमावले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ६८ पैकी ४० कसोटी सामने जिंकले, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजयाचाही समावेश आहे.