
सावधान! गरज असेल तरच घराबाहेर पडा!
पावसाचे जोरदार पुनरागमन, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, विजांसह जोरदार पाऊस होणार
मुंबई – मागील काही दिवसापासून उघडीप दिलेल्या पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. मे महिन्याच्या सुरूवातीला पावसाचा जोर जास्त होता, परंतु तो जून महिन्याच्या सुरूवातीपर्यंत ओसरला होता. पण आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणारा आहे.
हवामान विभागाने आज १९ जिल्ह्यांना विजांसह वादळी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. मे महिन्यात जोरदार तडाखा दिल्यानंतर मधल्या तीन ते पाच दिवसांत पावसाने थोडी सुट्टी घेतली होती. पण आता पावसाने सुरूवातीलाच यलो अलर्ट देत जोरदार पाऊस होणार असल्यचे संकेत दिले आहेत. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, रायगड, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, धाराशिव, लातूर, बुलडाणा, या जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या भागात भागात मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर गुजरात आणि उत्तर बांगलादेशवरील चक्राकार परिस्थिती आहे, ज्यामुळे वातावरणात अस्थिरता निर्माण होत आहे.अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागराकडे मान्सूनचा प्रवाह पुन्हा वाढण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे राज्यात पाऊस सुरूच राहील. नैऋत्य आणि पश्चिमेकडून येणारे वारे अधिक आर्द्रता आणत आहेत, त्यामुळे अनेक भागात पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे. दरम्यान गोंदिया, भंडारा, नंदुरबार, लातूर भागात मात्र हवामान कोरडं राहणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे, त्यामुळे इथल्या नागरिकांना पावसाचा कोणताही फटका बसणार नाही.
हवामान विभागाने काही जिल्ह्याना येलो अलर्ट दिला आहे. तसेच नागरिकांना आणि प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे, तसेच वाहतुकीवर याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे.