
मोठी बातमी! राज्यात नैसर्गिक आपत्ती जाहीर
शेतकऱ्यांसाठी 1300 कोटींच्या पॅकेजची घोषणा, शासन आदेश जारी; थेट बँकेत येणार पैसे
मुंबई – राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारकडून अतिवृष्टीने शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ पर्यंत जी मदत जाहीर केली होती त्या १३३९ कोटी रूपये मदतीचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुर्नविनियोजनाव्दारे तरतुद उपलब्ध करुन घेऊन कार्यासन यांनी हा निधी वितरित करावा, असे आदेश देण्यात आले आहेत. DBT पोर्टलव्दारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरीत करण्यात यावा. सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करुन संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरुन मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी. तथापि, चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेतीपिकांच्या नुकसानीकरिता वितरीत करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तांवातर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी. कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देतांना व्दिरुक्ती होणार नाही याची तहसिल व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी. वरील निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सुचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा. या आदेशाव्दारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाव्दारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करु नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील. लेखाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन प्रभाग यांना आहरण व संविरण अधिकारी आणि वित्तीय सल्लागार व सह सचिव यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे .अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत . घरादारांचे मोठे नुकसान झाले असून अनेक जनावरे दगावली आहेत .विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे .


