
“महिलांवर अत्याचार करणारे हे समाजात वावरणारे ‘लांडगे’ आहेत. अशा नराधमांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, एक-दोघांना ठेचले पाहिजे,” अशा शब्दांत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपला संताप व्यक्त केला.नाशिकमधील अशोक खरात प्रकरण आणि आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज कडक भूमिका मांडली.

नाशिकमधील आयटी कंपनीत झालेल्या महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, पॉश ॲक्टमध्ये बदल होणे गरजेचे आहे. ज्या कंपनीच्या सहली जातात तिथे पण महिलांचा छळ केला जातो. व्हॉट्सॲपच्या चॅटिंगमधून देखील महिलांना छळाला सामोरे जावे लागते. त्यामुळे याच्या बदल होणे गरजेचे आहे.

10 पेक्षा जास्त महिला असतील तिथे पॉश ॲक्ट लागू होतो. हे एक विभागाचे काम नाही. यासाठी भरारी पथक निर्माण केलं गेलं पाहिजे. ज्या गोष्टी कायद्यात सांगितल्या आहेत, त्याच्या तरतुदी झाल्या पाहिजे. 90 दिवसाच्या आत न्याय नाही मिळाला तर दंड झाला पाहिजे, अशी पण एक तरतूद यात केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना भेटून या सर्व गोष्टी आम्ही सांगणार आहोत. ज्या महिलांवर छळ करण्यात आले ते लांडगे आहेत, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. एक, दोघांना ठेचले पाहिजे. अनेक महिला पुढे येत नाहीत. मात्र, माझ्या प्रयत्नांना यश येईल. मी त्याचा पाठपुरावा करणार आहे, असे त्यांनी म्हटले.

अशोक खरात प्रकरणावर चित्रा वाघ म्हणाल्या की, अशोक खरातला ठेचण्याचे काम सुरू आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्याला सोडणार नाही. तीन महिन्या अगोदर ही कुणकुण लागली होती. त्याचे पुरावे आले, मग खरातवर कारवाई झाली. एखाद्याला पकडणे सोपे आहे. पण, त्याच्यावरचे आरोप सिद्ध करणे अवघड असते. खरातच्या मागे ईडी, एसआयटी, सीबीआय सगळे लागलेले आहेत. रोज त्यांचे प्रकरण बाहेर येत आहे. महिलांनी अजूनही पुढे येऊन तक्रारी कराव्यात. त्यांना आपण शिक्षा दिल्या शिवाय राहणार नाही, असे त्यांनी म्हटले.

