
मध्य पूर्वेत वाढत चाललेल्या तणावाचा थेट परिणाम आता भारतातील सामान्य नागरिकांवर दिसू लागला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी नवीन घरगुती एलपीजी (स्वयंपाकाचा गॅस) कनेक्शन देणे तात्पुरते थांबवले आहे.हा निर्णय गेल्या जवळपास महिनाभरापासून लागू असून, नवीन कनेक्शन पुन्हा कधी सुरू होणार याबाबत अद्याप कोणतीही निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.सीएनबीसीच्या वृत्तानुसार,गॅस पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणींमुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. भारत आपल्या एलपीजीच्या गरजेपैकी मोठा भाग आयातीवर अवलंबून आहे.

देशात दरवर्षी सुमारे 33 दशलक्ष टन एलपीजीचा वापर होतो, त्यापैकी जवळपास 65% गॅस आयात केला जातो. यातील बहुतांश पुरवठा पश्चिम आशियाई देशांकडून येतो, त्यामुळे त्या भागातील अस्थिर परिस्थितीचा थेट परिणाम भारतावर होतो.विशेषतः होर्मुझची सामुद्रधुनी ही जागतिक तेल आणि गॅस वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सध्या इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावामुळे या मार्गावरून होणाऱ्या जहाज वाहतुकीवर परिणाम होत आहे. या परिस्थितीत तेल कंपन्यांनी स्पष्ट केले आहे की, सध्या प्राथमिकता ही विद्यमान ग्राहकांना नियमित एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यावर आहे. त्यामुळेच नवीन कनेक्शन देणे तात्पुरते थांबवण्यात आले आहे.

यामुळे नवीन घरात स्थलांतर करणारे नागरिक तसेच पहिल्यांदाच एलपीजी कनेक्शन घेऊ इच्छिणाऱ्या कुटुंबांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. विशेषतः ग्रामीण भागात याचा अधिक परिणाम जाणवत आहे. तज्ज्ञांच्या मते, जर होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणाव वाढला, तर जागतिक पुरवठा साखळीवर आणखी गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, पश्चिम आशियातील संकट असूनही सरकारने एलपीजी, पेट्रोल, डिझेल आणि पीएनजीचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे सध्या सर्वसामान्य ग्राहकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागलेले नाही. सरकारकडून परिस्थिती पूर्ववत होताच नवीन एलपीजी कनेक्शन पुन्हा सुरू करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.


