
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत आकुर्डी येथील उन्नत शहर साधन केंद्रात पालकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. केंद्रातील सूचना फलकावर ठरावीक तारखा देऊनही प्रत्यक्षात उद्या या असे सांगत १५ एप्रिलपासून वारंवार केंद्रात येऊनही अद्याप ॲडमिट पत्र मिळालेले नाही, त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.आकुर्डी केंद्राची कामकाजाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी आहे. मात्र, शुक्रवारी सकाळी वेळेत आलो तरी ११:३० वाजल्यानंतर केंद्रात सोडले नाही, अशा तक्रारी काही पालकांनी केल्या. या केंद्रातील २२ पैकी केवळ १२ कर्मचारीच कार्यरत होते, तर १० कर्मचाऱ्यांना जनगणनेच्या कामावर पाठविल्याने कामकाजावर परिणाम झाला. त्यातच आरटीई संकेतस्थळाचा सर्व्हर डाऊन असल्याने अडथळे येत होते. या केंद्रात दररोज २०० अर्जांची पडताळणी केली जाते.

पटपडताळणीच्या कामामुळे एकही कर्मचारी येथ हजर नव्हता. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीत बांगर यांनी स्वतः केंद्रात धाव घेतली होती. त्या दिवशी सुमारे ७५० पालकांची कागदपत्र जमा केली होती. यातील अनेक पालकांना आठवडा उलटूनही अद्याप ॲडमिट पत्र मिळालेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. कागदपत्रांतील त्रुटी दुरुस्ती व योग्य कागदपत्र सादर करण्यासाठी काही पालकांना ये-जा करावी लागत आहे.प्रवेश अर्ज सादर केलेल्या ज्या बालकांचे स्टेटस ‘ॲडमिटेड’ आहे, त्यांनी दररोज दुपारी ३ वाजता उपस्थित राहून प्रवेश पावती घ्यावी. तसेच १३ ते २० एप्रिलदरम्यान अर्ज सादर केलेल्या पालकांची कागदपत्र तपासणी २१ ते २७ एप्रिलदरम्यान सकाळी १०:३० वाजता उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

मी १६ एप्रिलला कागदपत्र जमा केले होते. त्यावेळी मला टोकन देत २० तारखेला बाेलावले. त्यानंतर २१ आणि २२ आणि २४ तारखेला सकाळी आठ वाजताच आलाे. मात्र, दुपारी एक वाजले तरी मला ॲडमिट पत्र मिळालेले नाही. – विकेश इंगळे, पालकमी १७ तारखेला कागदपत्र जमा केली. २४ तारखेला बोलावले होते. त्यानुसार मी सकाळी साडेदहा वाजता आलो. माझा १३४ वा नंबर आहे. येथील काम संथगतीने सुरू आहे. – प्रभाकर तळे, पालक


