
मराठा आरक्षणाच्या लढ्याने आता पुन्हा एकदा पेट घेतला आहे! प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा घटनेने अधिकार दिला आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपल्या बहुप्रतिक्षित ‘मुंबई आंदोलना’ची घोषणा केली आहे. अंतरवाली सराटीतून निघणारे मराठा समाजाचे हे भगवे वादळ ५ व्या दिवशी थेट मुंबईतील आझाद मैदानात धडकणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १५ वा दिवस आहे. राज्य सरकारच्या विशेष विनंतीनंतर गेल्या ५ दिवसांपासून ते सलाईन आणि औषधोपचार घेत आहेत. शनिवारी दुपारी माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटलांनी उपस्थितांना, “आपण मुंबईला जायचे का?” असा प्रश्न विचारला, ज्यावर मराठा समाजाने एकमुखाने ‘होय’ असा जोरदार प्रतिसाद दिला.आपली रणनीती स्पष्ट करताना जरांगे पाटील म्हणाले की, “आपल्याला मुंबईत जाऊन जिंकून यायचे आहे. त्यामुळे मराठा समाजाने पूर्ण सहकार्य करावे आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन करून शांततेत सहभागी व्हावे.”

जरांगे पाटील यांनी आंदोलन शांततेत करण्याचे आश्वासन दिले असले, तरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि प्रशासनावर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.आंदोलकांच्या गाड्यांमुळे मुंबईचे मुख्य प्रवेशद्वार, सीएसएमटी, मंत्रालय आणि आझाद मैदान परिसरात अभूतपूर्व वाहतूक कोंडी होऊ शकते.आंदोलक लोकल ट्रेन आणि बसने प्रवास करण्याची शक्यता असल्याने, रोजच्या चाकरमान्यांना आणि बाप्पाच्या दर्शनासाठी बाहेर पडणाऱ्या भाविकांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागू शकतो. न्यायदेवतेच्या निर्णयानंतर जरांगे पाटलांच्या या मुंबई दौऱ्यामुळे राज्य सरकार आणि मुंबई प्रशासनाची धावपळ उडाली आहे. आता मराठा आरक्षणाचा हा लढा मुंबईत काय वळण घेतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


