
मुंबई प्रतिनिधी – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. राज्याचे पर्यावरण मंत्री व युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे आघाडीमध्ये मोठ्या घडामोडी घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पर्यावरण मंत्री असा उल्लेख हटवला आहे. त्यावर त्यांनी फक्त युवा सेना अध्यक्ष आणि मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशन अध्यक्ष एवढाच उल्लेख ठेवला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे हे मंत्रिपदाचा राजीनामा देणार की महाविकास आघाडी सरकार कोसळणार, याबाबतचे मोठे संकेत मिळू लागले आहेत.
- दरम्यान, शिंदे यांच्यासोबत चाळीसहून अधिक आमदार असल्याने पक्ष फुटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे मन वळवण्यासाठी मिलिंद नार्वेकरांना सुरतमध्ये चर्चेसाठी पाठवले होते. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शिंदे यांनी पुढं काय करायचं हे पक्क ठरवलं असून तसा निरोप ठाकरेंपर्यंत पोहचवला असल्याचे स्पष्ट झालं आहे. शिंदे यांनीच माध्यमांशी बोलताना याबाबत सूचक संकेत दिले आहेत