
छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोण जास्त मटण खाणार? या वादावरून भयंकर प्रकार घडला आहे. या वादात मित्राने मित्राची हत्या केली आहे.या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सिल्लोड तालुक्यातील धारला या गावात ही घटना घडली आहे.
जितेंद्र धृवे आणि ओमजय सूर्यवंशी या दोघांमध्ये मटणाचा वाद सुरू होता. या वादात ओमजयने जितेंद्रच्या डोक्यात रॉड मारली. मारहाण झाल्यानंतर जितेंद्रचा मृत्यू झाला. सिल्लोड तालुक्यातील धारला येथे शेतात मटणाची पार्टी सुरू होती. या पार्टीत मटन कोण जास्त खाणार? यावरून दोन मित्रांमध्ये वाद निर्माण झाला. यानंतर ओमजयने केलेल्या हल्ल्यात जितेंद्रचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे हे दोघे मित्र असून मध्य प्रदेशमधील आहेत. महाराष्ट्रामध्ये ते काम करण्यासाठी आले आहे.
मटन कोण जास्त खाणार? यावरून दोघात चांगलाच वाद निर्माण झाला होता. दोघेही दारूच्या नशेत असल्याने शेत मालकाने त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या मुद्द्यावरून दोघांचे भांडण थांबत नव्हते. संतप्त झालेल्या ओमजयने नशेत जितेंद्रवर वार केला, यातच जितेंद्रचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात खून झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.