
महाराष्ट्रात जनाधारासाठी आम आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा
स्वराज्य यात्रेतून 'आप'ची 'महाराष्ट्र' मोहीम स्वराज्य यात्रेची पंढरपूरातून सुरुवात
पुणे दि २६(प्रतिनिधी)- गुजरात निवडणूकीनंतर राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळालेल्या आम आदमी पार्टीने आता महाराष्ट्रात लक्ष केंद्रित केले असून पक्षाची भूमिका गावोगावी घेऊन जाण्यासाठी स्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रेची सुरुवात २८ मे रोजी पंढरपूर येथे विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाने होऊन ६ जून राज्याभिषेक दिनी रायगड येथे यात्रेची सांगता होणार आहे. स्वराज्य यात्रा सात जिल्ह्यातून जाणार असून या जिल्ह्यातील शहरे व गावांमध्ये सभा होणार आहेत. ७८२ किलोमीटरचा प्रवास ही यात्रा करेल. पक्षाचे राष्ट्रीय सह-सचिव व प्रदेश सह-प्रभारी युवा नेते गोपाल इटालिया ज्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला गुजरातमध्ये १३ टक्के मतदान मिळवत आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला, याच इटालिया यांच्या मार्गदर्शनात ही यात्रा होणार असल्याचे मुकुंद किर्दत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आज महाराष्ट्रात सर्वत्र प्रशासनच राज्य करत आहे. देशातला आणि जगातली सर्वात मोठा पक्ष म्हणवून घेणारा भाजप महाराष्ट्रात मात्र हरण्याच्या भीतीने एकही निवडणूक होऊ देत नाही आणि त्यामुळेच प्रशासन मनमानी कारभार करते आहे. भ्रष्टाचारावर कुणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. या दडपशाही विरोधात आवाज उठवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील सुराज्य आणण्यासाठी आम आदमी पार्टी वचनबद्ध आहे’ असे गोपाल इटालिया यांनी सांगीतले.
मागील विधानसभा निवडणुकीनंतर विविध राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या पद्धतीने युत्या करत सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न केले. या सर्वच प्रस्थापित पक्षांची विश्वासार्हता संपली असल्यामुळेच महाराष्ट्रातील जनता नवीन पर्याय शोधते आहे आणि आम आदमी पार्टी आज काम की राजनीती करणारा नवा पर्याय म्हणून समोर येत असल्याचा गोपाल इटालिया यांनी म्हटले आहे. या पत्रकार परिषदेला गोपाल इटालिया यांच्या सोबत मुकुंद किर्दत, विजय कुंभार, धनंजय शिंदे, विजय फाटके उपस्थित होते.