![Ganesh J GIF](https://maharashtrakhabar.com/wp-content/uploads/2022/08/gif-advt.gif)
बारावीच्या परिक्षेचा निकाल पाहिला आणि टोकाचा निर्णय घेतला
वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या साक्षीने उचलले टोकाचे पाऊल, परिसरात उडाली खळबळ
पुणे दि २६(प्रतिनिधी)- काल बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. पण आता त्यानंतर काही विद्यार्थ्यांकडून नापास होऊन टोकाचे निर्णय घेतल्याचे प्रकार समोर आले आहेत. बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवड येथील दापोडी परिसरात घडली आहे.
साक्षी राम कांबळे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती दापोडी येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. इयत्ता बारावीचा निकाल गुरुवारी दुपारी दोन वाजता ऑनलाईन जाहीर झाला. त्यापूर्वी साक्षी घरातून जेवण करून निकाल पाहण्यासाठी बाहेर पडली. काही वेळेनंतर ती निकाल पाहून घरी आली. तिला परीक्षेत अपयश मिळाल्याचे तिने घरच्यांना सांगितले. घरच्यांनी देखील तिच्यावर कुठलाही दबाव आणला नाही. काही हरकत नाही, पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षा दे, असे तिच्या वडिलांनी समजावून सांगितले. त्यानंतर ती घरात वरच्या मजल्यावर तिच्या खोलीत गेली. तिथे तिने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आपले जीवन संपवले.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर घरच्यांनी तिला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.