पुणे दि २४(प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे आमदार सातारा भाजपाचे अध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात त्यांची कार बैणगंगा नदीच्या पुलावरून ५० फूट खोल खड्ड्यात कोसळली. या अपघातानंतर जयकुमार गोरे यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.मात्र या अपघाताबाबत जयकुमार गोरे यांचे वडील भगवान गोरे यांनी खळबळजनक विधान केले आहे. त्यामुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.
जयकुमार गोरे यांचे वडील भगवान गोरे म्हणाले की, “मी आमदारांशी बोललो आहे. त्यांची प्रकृती ठीक आहे. मात्र एक शंका मनात उत्पन्न होत आहे. रस्त्यावर कुठलीच वाहतूक नसताना गाडीला अपघात कसा घडतो, असा प्रश्न मला पडला आहे. आमच्या गावात म्हणजे फलटणमध्येच हा अपघात घडला आहे; यामुळे जास्तच शंका येत आहे,” दरम्यान आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी देखील गोरे यांची विचारपूस केली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की, “मी आमदार गोरेंशी चर्चा केली. ते स्वतः माझ्याशी बोलले. अगदी स्पष्ट सांगायचं तर गोरे यांच्या पत्नीने सांगितलं की, ते चर्चा करताना आज हसलेदेखील. त्यांची तब्येत चांगली असल्याने त्यांना कोणताही धोका नाही. पुढील पाच ते सहा दिवसात ते आयसीयूतून बाहेर येतील,” अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली आहे.
जयकुमार गोरे यांच्या गाडीला पुणे-पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळील मलठण स्मशानभूमी लगत अपघात झाला.चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यात गाडी बैणगंगा नदीच्या पुलावरून ५० फूट खोल खड्ड्यात गेली. या अपघातात गोरेंबरोबरच गाडीमधील इतर दोघे किरकोळ जखमी आहेत. त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरु आहेत.