![Ganesh J GIF](https://maharashtrakhabar.com/wp-content/uploads/2022/08/gif-advt.gif)
आम आदमी पार्टीच्या स्वराज्य यात्रेनंतर आता स्वराज्य संवाद
आप आपले मुद्दे घरा घरापर्यंत पोहोचवणार, नवीन कार्यकर्ते जोडण्यासाठी स्वराज्य संवाद मोहीम
पुणे दि १५(प्रतिनिधी)- नुकत्याच आठशे किलोमीटर प्रवास करीत आठ जिल्ह्यात पदयात्रा आणि सभामार्गे संवाद साधत आम आदमी पार्टीने पंढरपूर ते रायगड अशी स्वराज्य यात्रा पूर्ण केली आहे आणि आता सर्वसामान्य व्यक्तीशी संपर्क साधत पक्षांमध्ये पाच लाख नवीन सदस्य जोडण्याचे उद्दिष्ट ठेवत ‘स्वराज्य संवाद’ नावाचा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे असे आम आदमी पार्टीचे पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
आपने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर ही पश्चिम महाराष्ट्रातील स्वराज्य यात्रा काढून विविध राजकीय पक्षांचे लक्ष वेधले आहे. आता त्याचाच पुढचा टप्पा म्हणून शहरी आणि ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांशी छोट्या कोपरा सभा घेत, संवाद साधत नवीन कार्यकर्ते जोडण्याची मोहीम राबवली जाणार आहे. या कोपरा सभेमध्ये या संवाद यात्रेचे महत्त्व तसेच दिल्ली आणि पंजाब मधील दिलेल्या कामांची माहिती व महाराष्ट्रातील राजकारणामध्ये आम आदमी पार्टीचे महत्त्व याविषयी स्थानिक कार्यकर्ते माहिती देतील व सदस्य नोंदणी करतील. गुजरात मधील सुरतच्या महानगरपालिकेमध्ये २३ नगरसेवक निवडून आणण्याची किमया करणारे युवा नेते व महाराष्ट्राचे सह प्रभारी गोपाल इटालिया यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबवली जाणार आहे. गेले वर्षभर महाराष्ट्रामध्ये शिंदे व फडणीस सरकार सत्तेत आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोघेही जनतेचे प्रश्न बाजूला ठेवत एकमेकांची उणीदूणी काढण्यामध्ये गर्क आहेत. पालिका व महानगरपालिकांच्या निवडणुका न झाल्यामुळे सर्व कारभार प्रशासनाच्या ताब्यात आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न सुटणे अवघड झाले आहे. यामुळेच आम आदमी पार्टी जनसंवाद मोहीम राबवत असल्याचे यावेळेस सांगण्यात आले.
पुणे शहरामध्ये तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गटांच्या गावांमध्ये रोज संध्याकाळी कोपरा सभा घेतल्या जाणार आहेत. असेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे.