
अजितदादा बारामती मतदारसंघातून वीस हजार मतांनी पराभूत?
राज्यातील 'या' दीडशे मतदारसंघातील मतांमध्ये फेरफार?, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
मुंबई – महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत मोठ्या बहुमताने महायुती सरकारला विजय मिळाला. तर महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक संख्याबळ देखील मिळवता आले नाही. हा निकाल लागल्यानंतर ईव्हीएमवरून बरेच वादंग निर्माण झाले होते. तसेच अनेक नेत्यांनी फेरमतदानाची मागणी केली होती. पण आता एक नवीनच दावा करण्यात आला आहे.
महायुतीत २३० हुन अधिक जागा जिंकत सत्ता स्थापन केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जाणकार यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. अजित पवार बारामती मतदारसंघात वीस हजार मतांनी पराभूत आहेत, असा दावा करताना त्यांनी पूर्ण गणिताची मांडणी केली आहे. ते म्हणाले बारामती मतदारसंघातून अजित पवार हे २० हजार मतांनी पराभूत झाले आहेत. अजित पवारांना १ लाख ८० हजार जी मत पडली आहेत. त्याला दोनास एक असे प्रपोजल लावण्यात आले होते.
त्यामुळे युगेंद्र पवारांची मत ८० हजार अधिक ६० हजार अशी १ लाख ४० हजार मते आहेत आणि त्यात अजित पवारांची ६० हजार मते वजा होतात, त्यामुळे अजित पवार पराभूत झालेत, एवढेच नाहीतर राज्यातील जवळपास दीडशे मतदारसंघात फेरफार करण्यात आली असून याविरोधात लवकरच निवडणुक आयोगाकडे दाद मागणार असल्याचे जानकर यांनी सांगितले. या निवडणूकीत अजित दादा यांचे फक्त १२ आमदार निवडून आले आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे फक्त १८ आमदार निवडून आले आहेत. तर भाजपचे ७७ आमदार निवडून आले आहेत. अशी त्यांची सर्व मिळून १०७ आणि अपक्ष मिळून ११० अशी त्यांची संख्या आहे. बाकी ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय झाला असल्याचा दावा जानकर यांनी केला आहे.
पुढील चार महिन्यांच्या आत महायुतीचे सरकार जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळेल. त्या दृष्टीने व्यूहरचना आखली आहे असं म्हणतं जानकर यांनी ईव्हीएमच्या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक होणार असल्याचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे ईव्हीएमचा हा वाद आणखी पेटणार असे चित्र निर्माण झाले आहे.