![Ganesh J GIF](https://maharashtrakhabar.com/wp-content/uploads/2022/08/gif-advt.gif)
भाजपच्या आणखी एका नेत्याचे शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान
भाजपाच्या अडचणीत वाढ, राज्यात नवा वाद पेटण्याची शक्यता
मुंबई दि ४(प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करण्याची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी,भाजपाचे नेते मंगलप्रभात लोढा, आमदार संजय गायकवाड यांच्यानंतर आता भाजपाचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी देखील महाराजांबद्दल चुकीची माहिती देणारे विधान केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यामुळे भाजपासमोरच्या अडचणीत वाढ होत आहे. यामुळे विरोधकांनी भाजपावर निशाना साधला आहे.
राष्ट्रवादीने समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत भाजपाचे आमदार प्रसाद लाड बोलताना दिसत आहेत. ‘संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला. त्यानंतर रायगडावर त्यांचं बालपण गेलं. रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यामुळे सुरुवात कोकणात झाली,’ असे विधान प्रसाद लाड करताना दिसत आहेत. यामुळे राष्ट्रवादीने आक्रमक होत भाजपावर टिकास्त्र सोडले आहे. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या,’ असा टोला राष्ट्रवादीने लगावला आहे. तर अमोल मिशनरी यांनी भाजपाला टोला लगावताना उद्या गुजरात महोत्सव घ्यायचा असेल तर गुजरातच्या लोकांना खुश करण्यासाठी ते शिवरायांचा जन्म गुजरातच्या सुरतमध्ये झाला, असे म्हणतील, म्हणत भाजपाला सुनावले आहे. यामुळे भाजपा अडचणीत सापडली आहे.
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या.@PrasadLadInd@BJP4Maharashtra pic.twitter.com/gU1P43QLFD
— NCP (@NCPspeaks) December 4, 2022
मागील काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त टिप्पणी केली. त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीदेखील शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले. पर्यटनमंत्री तथा भाजपाचे नेते मंगलप्रभात लोढा यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा सुटकेशी केली. या सर्व टीका-विधानांमुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे.