
सावधान! भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतोय
देशात आत्तापर्यंत एवढ्या जणांना कोरोनाची लागण, राज्यात दोघांचा मृत्यू, काळजी घेण्याचे आवाहन
मुंबई – भारतसह जगाला हादरवून सोडणारा कोरोना आजार आजही धडकी भरवणारा आहे. संपूर्ण जग यामुळे लाॅकडाऊन करावे लागले होते. लाखो लोकांचा यामुळे मृत्यू झाला होता. पाच वर्षानंतर याच कोरोना आजाराने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे.
मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये दोन संशयित कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने शहरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही रुग्णांचे मृत्यूपूर्वी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. दोन्ही रुग्णांचा मृत्यू त्यांच्या आधीपासून असलेल्या गंभीर आजारांमुळे झाला आहे. मृतांमध्ये कॅन्सर झालेली महिला आणि मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त मुलगी यांचा समावेश आहे, असे स्पष्टीकरण हॉस्पिटल प्रशासनाने दिले आहे. भारतामध्ये सध्या ९३ सक्रिय रुग्ण असून, गेल्या आठवड्यात ५८ नवीन प्रकरणं समोर आली आहेत. विशेष म्हणजे देशात चाचण्या कमी झाल्या असतानाही रुग्णसंख्या वाढत आहे, ज्यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. देशातील बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य अधिकाऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. आरोग्य तज्ञ आणि डॉक्टरांनी लोकांना घाबरण्याऐवजी सतर्क आणि सावध राहण्याचे आवाहन केले आहे. भारतीय लोकांमध्ये चांगली प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. सध्या कोरोना पुनर्लसीकरणाची गरज नाही, पण फ्लूच्या लसीचा लाभ होऊ शकतो, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण सौम्य लक्षणांसह आढळत असून, २०२० ते २०२२ दरम्यान उद्भवलेल्या तीव्र साथीप्रमाणे परिस्थिती नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
सिंगापूरमध्ये कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या १४ हजार २०० वर पोहोचली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सिंगापूरमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत २८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे भारत आतापासून सतर्क झाला आहे.