
खबरदार! भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर युद्ध…
भारत सरकारचा मोठा निर्णय, आक्रमक पद्धतीने देणार उत्तर, अॅक्ट आॅफ वाॅर म्हणजे काय?
दिल्ली – पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावाचे झाले होते. त्यामुळे दोन देशात युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकला पाकिस्तान देखील उत्तर देताना दिसला. सध्या शस्त्रसंधी झाली असली तरीही भारताने मोठा निर्णय घेतला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. यावेळी पाकिस्तानने सुरू केलेल्या कारवायांची चर्चा झाली. तसेच यावेळी दहशतवादी हल्ले आणि पाकिस्तान यांच्याविरोधात सरकारने एक मोठे आणि कठोर पाऊल उचलले आहे. आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता जर भारताविरोधात कोणत्याही दहशतवादी कारवाया झाल्या तर ते देशाविरुद्ध युद्ध मानले जाणार आहे. ऍक्ट ऑफ वॉरनुसार त्याला आता प्रत्युत्तर दिले जाणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे हे स्पष्ट झाले आहे की भारत यापुढे पाकिस्तानकडून होणारे दहशतवादी हल्ले सहन करणार नाही. जर पाकिस्तानने अजूनही दहशतवादी हल्ले थांबवले नाहीत तर भारत आता शांत बसणार नाही. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू असून, आज मोदींनी बोलावलेल्या उच्चस्तरीय बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सीडीएस आणि तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख उपस्थित होते. दरम्यान सकाळी परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यात कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, भारतीय लष्कराने प्रत्युरात केलेल्या कारवाईत सियालकोट येथील एअरबेसवर हल्ला करत त्याला उद्ध्वस्त केले आहे. पाकिस्तानकडून २६ हून अधिक ठिकाणी हल्ले करण्यात आल्याचेही यावेळी कुरेशी यांनी सांगितले होते.
भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांना यशस्वीपणे तोंड दिले. गुजरातच्या कच्छ येथे एल-७० हवाई संरक्षण तोफेने पाकिस्तानी ड्रोन पाडले. बीएसएफने जम्मूच्या अखनूरसमोरील सियालकोट येथील आतंकी तळ उद्ध्वस्त केले. श्रीनगर येथे जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे.