![Ganesh J GIF](https://maharashtrakhabar.com/wp-content/uploads/2022/08/gif-advt.gif)
पाऊस राजकारणाचा अंदाज सांगणारी भेंडवळची प्रसिद्ध भविष्यवाणी जाहीर
यंदा पाऊस पाणी कसं असणार, राजकारणात उलथापालथ होणार का? एकदा वाचाच
बुलढाणा दि २३(प्रतिनिधी)- राज्यातील सर्व शेतकरी व नागरिक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात त्या ३५० वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळ घटमांडणीचे भाकीत जाहीर झाले आहे. राज्यात यंदाही अवकाळी आणि अतिवृष्टी पाऊस पडण्याचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. या भविष्यवाणीने बळीराजाच्या चिंतेत भर घातली आहे. राजकारणावरही भाष्य करण्यात आले आहे.
या वर्षी पावसाबद्दल अंदाज जाहीर करताना जून महिन्यात कमी पाऊस पडणार असल्याने पेरणी उशिरा होईल. तर जुलै महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. दरम्यान ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडणार असून, अतिवृष्टी देखील होईल. तर सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी असेल. याबरोबरच अवकाळी पाऊस भरपूर होणार असून, पिकांचे नुकसान होईल त्याचबरोबर यावर्षी पिकांवर रोगराई राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राजकीय परिस्थितीवर भाकित वर्तवताना देशाचा राजा कायम असणार, म्हणजे पंतप्रधान कायम राहील असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. मात्र पारावरच्या घट मांडणीत पहिल्यांदाच विंचू निघाल्याने देशात रोगराईची परिस्थिती असणार, असे भाकीत यंदा वर्तवण्यात आले आहे. त्याचबरोबर संरक्षण क्षेत्र मजबूत राहील, मात्र शेजारील राष्ट्राच्या कुरघोड्या सुरूच राहतील. देशाची आर्थिक परिस्थिती खालावेल आणि चढउतार सुरू राहतील. मात्र या भाकीतात महाराष्ट्राविषयी भाकीत टाळण्यात आले कारण भविष्यवाणी देशाची असते, राज्याची नसते असे सांगण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ परिसरातील ३५० वर्षांपासून अक्षय तृतीयेला भाकिताची प्रथा जोपासली जाते. या प्रथेला शेतकऱ्यांची मोठी मान्यता आहे.. या मांडणीतून जाहीर केलेल्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. एका शेतात खड्डा खोदला जातो. या खड्ड्यात मातीचा घट ठेवण्यात येतो व त्याघटात पाणी भरले जात. त्यावर कुरडया, त्याच्या बाजूला पान सुपारी आणि विविध 18 प्रकारची धान्य, अशा या ‘घट मांडणी’तून भाकित केले जाते.