दिल्ली दि ९(प्रतिनिधी)- महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही राजकीय भूकंप झाला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आॅपरेशन लोटसच्या आधीच भाजपसोबतची युती तोडली आहे. नितीश कुमार यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. आता बिहारमध्ये जेडीयू आणि आरजेडी यांच्या सहकार्याने नवे सरकार स्थापन होणार आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वाखालील नव्या सरकारला काँग्रेसनेही पाठींबा जाहीर केला आहे.
मुख्यमंत्री नितीशकुमार राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेणार आहेत. जेडीयूच्या सर्व आमदार आणि खासदारांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भाजपसोबत युती तोडण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. बिहारमध्ये २०२० च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि जेडीयूने एकत्र निवडणूका लढवल्या होत्या.पण त्यानंतर त्यांच्यात वाद वाढत गेले. केंद्रीय मंत्रिमंडळातील जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमधील तणाव वाढला होता.मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केंद्राच्या नीती आयोगाच्या बैठकीला गैरहजेरी लावत भाजपवरील आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा २०१५ सालची पुनरावृत्ती होत नितिश- लालूचे सरकार सत्तेत येणार आहे.