
मुंबई दि १६ (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षानं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यावरून हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे संकेत दिले आहेत. विरोधकांनी सरकारच्या चहापाणावर देखील बहिष्कार टाकला आहे.
अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले की, “महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यापेक्षा नको ते विषय पुढे आणले जात आहेत. आता कुणी कुणाला भेटल्यावर जय हिंद म्हणतो, कुणी जय हरी म्हणतो. आता मध्येच काय यांनी वंदे मातरम काढलं. आमचा वंदे मातरम म्हणण्याला विरोध नाही. पण हा विषय सध्या महत्वाचा आहे का? महागाईवर बोला, जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावला आहे त्याचं काय करणार आहात? यावर बोलायला हवं. उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. पण मूळात हे सरकारचं लोकशाहीच्या मूल्यांना पायदळी तुडवून अस्तित्वात आलेलं सरकार आहे. त्यामुळे आम्ही अधिवेशनाआधीच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे असे पवार यांनी स्पष्ट केले.
सरकार येऊन काही दिवसच झाले. पण सत्ताधारी पक्षाचे आमदार धमकीची, मारामारीची भाषा करतात. हिंगोलीचे आमदार संतोष बांगरांनी एका मॅनेजरला मुस्काटीत मारली तर इकडे मुंबईतील आमदार प्रकाश सुर्वे यांनी कार्यकर्त्यांना चिथावणी देताना तंगड्या तोडा सांगितलं. महाराष्ट्रात चाललंय काय? मला त्या दोन आमदारांना विचारायचंय, सत्ता आली म्हणू काय मस्ती आली काय?”अशा शब्दात अजित पवार यांनी शिंदे गटाच्या वादग्रस्त आमदारांना झापल आहे.