
मुंबई ही गुजरातची राजधानी होती
जय गुजरात नंतर शिंदे गटाच्या मंत्र्याकडून पुन्हा गुजरातचा नारा, वादग्रस्त वक्तव्यामुळे शिंदे गटातच तणाव, विरोधक आक्रमक
मुंबई – एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत वादग्रस्त विधाने करण्याची स्पर्धा लागली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात जय गुजरात म्हटल्यानंतर महाराष्ट्रात गदारोळ उडाला होता. त्यातच आता केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांच्या वक्तव्याने नवीन वाद सुरु झाला आहे.
धाराशिवमध्ये बोलताना प्रतापराव जाधव यांनी मुंबई गुजरातची राजधानी होती असे वक्तव्य केले आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, “संयुक्त महाराष्ट्र ज्यावेळी होता त्यावेळी मुंबई ही गुजरातचीही राजधानी होती. मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुजराती लोक राहतात. गुजरात हा काही पाकिस्तानचा प्रांत नाही, आपल्याच शेजारचे राज्य आहे. त्यामुळे अशा गोष्टीचे राजकारण करायला नको. ज्या ज्या कार्यक्रमात आम्हाला बोलावलं जातं त्यावेळी आम्ही आमचा स्वाभिमान जपून त्यांचाही स्वाभिमान जागृत करतो. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी केलेले वक्तव्य चुकीचं नाही. यावेळी उद्धव ठाकरेंना हा प्रश्न कुणी का विचारत नाही. शिवाजी पार्कवरून बाळासाहेब ठाकरे तमाम ‘हिंदू बांधवांनो’ म्हणायचे. उद्धव ठाकरे ते विसरले. त्यांनी हिंदुत्व का सोडला याबाबत कोणी विचारत नाही. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही या म्हणीप्रमाणे त्यांची अवस्था झाली आहे,” अशी टीका प्रतापराव जाधव यांनी केली आहे. त्याचबरोबर ठाकरे बंधूंनी हा विजय मेळावा घेण्याऐवजी पश्चाताप मेळावा घ्यायला हवा होता आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांना बोलवावे असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला आहे. दरम्यान प्रतापराव जाधव यांच्या वक्तव्यामुळे विरोधक आक्रमक झाले असून, त्यांनी जाधव यांच्यावर जोरदार टिका केली आहे. शिंदे गटातील नेते वारंवार वादग्रस्त विधाने करत असल्यामुळे पक्षातील इतर नेते मात्र कमालीचे नाराज असून याचा फटका निवडणुकीत बसू शकतो, याची चिंता त्यांना आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये गुजराती समाजाचा एक कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शाहांची स्तुती केली आणि भाषणाच्या शेवटी ‘जय गुजरात’चा नारा दिला. यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली.