
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी जवान नवरदेव देशासाठी सीमेवर
नव्या नवरीला अश्रू अनावर, पण जवानाचे देश सेवेला प्राधान्य, 'सिंदूर' साठी 'कुंकू' देशसेवेला
वाशिम – भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं. त्यामुळे अनेक जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकांचे कुंकू सीमेवर आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे सुट्टीवर असलेल्या जवानांना तातडीनं ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. या सर्व घडामोडीत वाशिम जिल्ह्यातल्या जऊळका रेल्वे या गावातील जवान कृष्णा राजू अंभोरे यांनी अनोखा आदर्श समोर ठेवला आहे. कारण कृष्णा यांचे दोन दिवसापूर्वीच लग्न झाले होते. पण त्यांना देशसेवेला महत्व देत सीमेवर देशाच्या रक्षणासाठी रवाना झाले आहेत. कृष्णाच्या नवविवाहित पत्नीच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. पतीच्या सहवासाचा आनंद पुरेपूर उपभोगण्याआधीच विरहाचे दुःख तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. नवविवाहित पत्नीच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण कृष्णाच्या डोळ्यात देशसेवा होती. त्यामुळे भावनांवर मात करत कृष्णा तात्काळ ड्युटीवर रवाना झाला. तो उत्तराखंडमधील ड्युटीसाठी वाशिम रेल्वे स्टेशनवर पोहोचला, तेव्हा गावातील नागरिकांनी त्याला देशभक्तीच्या जयघोषांसह निरोप दिला. यावेळी वातावरण देशप्रेमाने भरून गेले होते. गावकऱ्यांनी “जय जवान”, “वंदे मातरम्” अशा घोषणा देत त्याचं कौतुक केलं. गावातील वृद्धांपासून लहानग्यांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर अभिमान स्पष्ट दिसत होता. अनेकांनी देश सेवेसाठी आपले कुंकू राष्ट्राच्या स्वाधीन केले आहे.
यापूर्वी जळगाव जिल्ह्यातील पाचरोमधील नवविवाहित जवान मनोज ज्ञानेश्वर पाटील देखील तातडीनं कर्तव्य बजावण्यासाठी सीमेवर रवाना झाले आहेत. मनोजचे यामिनी हिच्याशी ५ मेला लग्न झाले. या लग्नासाठी ३० दिवसांची सुट्टी घेऊन मनोज पाटील गावी आले होते. पण त्यांनाही दोन दिवसातच सेवेसाठी जावे लागले होते.