
…म्हणून पतीने केली पत्नीची लोखंडी राॅडने हत्या
छत्रपती संभाजीनगरमधील घटनेने खळबळ अकरा महिन्याच्या संसाराचा हत्येने शेवट
छत्रपती संभाजीनगर – पती पत्नीत विश्वास खुप महत्वाचा असतो. जर का त्याच्या नात्यात संशय आला तर नाते संपण्यास वेळ लागत नाही. अशीच एक घटना संभाजीनगरमध्ये समोर आली आहे. पती संशय घेत असल्याने माहेरी असलेल्या पत्नीची पतीने सासुरवाडीत जाऊन लोखंडी रॉडने मारहाण करत हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
भारती वाघ असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे तर विठ्ठल वाघ असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीवरून विठ्ठल वाघ व भारती यांचा विवाह अकरा महिन्यांपूर्वी झाला होता. विवाह झाल्यानंतर काही दिवस गुण्यागोविंदाने गेले. मात्र विठ्ठल वाघ हा पत्नी भारती हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला सतत त्रास देत होता. यामुळे दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले होते. कायम वाद होऊ लागल्यामुळे दोघे पुन्हा गावी राहण्यास गेले. तेथेही भारतीला त्रास सुरू होता. यामुळे भारतीने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान भारतीचे वडील ८ डिसेंबरला मुलीला माहेरी घेऊन आले. मात्र १६ डिसेंबरला सकाळी भारतीची आई रंजना, भाऊ राहुल आणि तिची वहिनी हे तिघेजण कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी घरी भारती आणि तिच्या भावाची चार वर्षांची मुलगीच होती. याचवेळी भारतीचा पती विठ्ठल वाघ हा तेथे आला. यावेळी त्याचा भारतीसोबत पुन्हा वाद झाला. दोघांमधील हा वाद विकोपाला गेला. यातच विठ्ठल वाघ याने लोखंडी रॉडने भारतीच्या डोक्यात जोरदार वार केला. यातच तिचा मृत्यू झाला. याबाबतर शेजाऱ्याने तिच्या वडिलांना माहिती दिली. यानंतर वडील घरी आले असता त्यांनी भारतीला घाटीत नेले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
हि धक्कादायक घटना महूनगर भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी पती विठ्ठल वाघ विरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकरा महिन्यापूर्वी विवाह झाला असताना संशयाच्या सुईने संसाराची राखरांगोळी केली आहे.