
दहशतवाद्यांनी पँट काढायला लावली आणि खतना न केलेल्यांचीच केली हत्या
पहलगाम हल्ल्यात हिंदूच होते निशान्यावर, तपास पथकाकडून मोठा खुलासा, मृतदेहांची अवस्था होती गंभीर
श्रीनगर – काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक खुलासे झाले आहेत. धर्म विचारून हत्या करण्यात आल्याचे सुरूवातीला सांगण्यात आले होते. पण आता प्राथमिक चाैकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जम्मू काश्मीर पोलीस आणि प्रशासनाच्या संयुक्त चौकशी समितीने या प्रकरणी धक्कादायक खुलासे केले आहेत. दहशतवाद्यांनी पीडितांकडे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स मागितलं. कलमा वाचायला सांगितला आणि त्यानंतर पँट काढायला लावून ‘खतना’ तपासले. पर्यटक हिंदू आहेत की नाहीत हे पाहिल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांना जवळून गोळी मारली. तपास करणाऱ्यांना असं आढळून आले की, २० मृतांची पँट खाली ओढलेली होती किंवा त्यांची चेन उघडली होती. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचं नाव, धर्म विचारून डोक्यात गोळी मारल्याचं प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हल्ल्यानंतर लगेच मदत मोहिम राबविण्यात आली. यावेळी सुरक्षा दलांनी मृतदेह आहे त्या अवस्थेत ताब्यात घेतले. दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी २५ हिंदू पुरुष होते. तसेच पीडित कुटुंबियांना हल्ल्यामुळे मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्यांचे कपड्यांकडे लक्ष नसावे. घटनास्थळी गेल्यावर बचावपथकानेही मृतदेह तसेच उचलले होते. फक्त पांढऱ्या कापडाने ते झाकले होते. दरम्यान त्राल, पुलवामा, अनंतनाग, कुलगाम यासारख्या परिसरात जवळपास ७० दशतवादी समर्थक आणि ओवरग्राउंड वर्कर्सची चौकशी सुरू आहे. सुरुवातीला १५०० जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यापैकी ७० जणांवर दाट संशय आहे. लवकरच दोषींपर्यंत पोहोचू अशी अधिकाऱ्यांना आशा आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास आता सुरू आहे. संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर भारत सरकारनेही पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई केली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने अधिक सैन्याची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे. तसेच पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेवर गोळीबार केला पण भारतीय जवानांनीही याला प्रत्युत्तर दिले आहे.