
“बाहेरून मदतीचा आव, आतून सैतानी डाव! बेपत्ता मुलीच्या शोध मोहिमेत जो सर्वात पुढे होता, तोच निघाला तिचा मारेकरी!”
महाराष्ट्र दिनी (१ मे) अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडली. एका ९ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येत असून, ६५ वर्षीय आरोपीचा जुना ‘काळा इतिहास’ उघड झाला आहे.

चिमुरडी बेपत्ता झाल्यानंतर तिची आजी आणि संपूर्ण गाव जेव्हा चिंतेत शोध घेत होतं, तेव्हा हा नराधम देखील त्याच गर्दीत सामील होता. “कुठे गेली असेल?”, “कशी सापडेल?” असे प्रश्न विचारत तो मदतीचा बनाव करत होता. मात्र, काही ग्रामस्थांनी जेव्हा त्याला विचारणा केली, तेव्हा त्याच्या बोलण्यातील गोंधळ आणि उडवाउडवीच्या उत्तरांमुळे संशय बळावला. पोलिसांनी खाक्या दाखवताच या नराधमाने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.या प्रकरणातील आरोपी हा मूळचा भोर तालुक्यातील साळवडे गावचा रहिवासी. आरोपीच्या विकृत मानसिकतेची कल्पना साळवडे गावकऱ्यांना २० वर्षांपूर्वीच आली होती.आरोपीची नजर सुरुवातीपासूनच महिला आणि मुलींवर वाईट होती. महिलांसंबंधी असभ्य वर्तणुकीमुळे त्याच्यावर यापूर्वी दोन गुन्हे दाखल झाले होते.त्याच्या सततच्या विकृतपणामुळे साळवडे गावकऱ्यांनी एकमुखी ठराव करून त्याला २० वर्षांपूर्वीच गावातून हाकलून दिले होते.

साळवडे गावातून हकालपट्टी झाल्यानंतर तो नसरापूर परिसरात छोटी-मोठी कामे करून राहत होता. पण म्हणतात ना, ‘स्वभाव बदलायला आयुष्य जातं, पण विकृती जात नाही.’ वयाच्या ६५ व्या वर्षीही त्याने एका निष्पाप चिमुरडीचा बळी घेतला. आधीच्या गुन्ह्यांतून सुटल्यानंतर तो पुन्हा मोकाट फिरत होता, ज्याचा भयानक परिणाम आज समोर आला आहे.या अमानुष घटनेमुळे पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीवर कठोर कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.


