उद्धव ठाकरेंच्या मालमत्तेची ईडी-सीबीआयकडून चौकशी होणार?
मुंबई हायकोर्टात याचिका दाखल, ठाकरेंच्या संपत्तीबाबत धक्कादायक आरोप
मुंबई दि १९(प्रतिनिधी)- शिवसेना पक्ष प्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी त्यांची ईडी आणि सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. पहिल्यांदाच ठाकरेंच्या संपत्तीच्या मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे.त्यामुळे पुन्हा एकदा राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

गाैरी भिडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मुंबई पोलिसांत तक्रार देऊनही कारवाई झाली नाही. त्यामुळे याचिका केल्याचा दावा भिडे यांनी केला आहे.विशेष म्हणजे या याचिकेत केंद्र सरकार, राज्य सरकार, सीबीआय, ईडीसह उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरे यांनाही याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. ठाकरे कुटुंबाने कशाप्रकारे भ्रष्टाचार केला आणि बेहिशेबी मालमत्ता जमा केली हे सांगणारी काही कागदपत्रे याचिकेसह जोडण्यात आली आहेत. एखाद्या राजकीय पक्षात स्वत: अधिकृत पद धारण करणे, हे उत्पन्नाचे कायदेशीर स्त्रोत होत नाही. त्याचप्रमाणे, कोणत्याही राज्यात मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रिपदाची घटनात्मक पदावर असणे हे देखील उत्पन्नाचे साधन नाही. उद्धव, आदित्य आणि रश्मी यांनी कधीही सेवा, व्यवसाय आणि व्यवसाय त्यांच्या उत्पन्नाचे अधिकृत स्त्रोत उघड केले नाहीत. तरीही त्यांच्याकडे मुंबईसारख्या शहरात आणि रायगड जिल्ह्यात प्रचंड मालमत्ता असल्याचे आढळून आले आहे, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. तसेच ठाकरे कुटुंबाच्या संबंधितांकडे आढळलेल्या मालमत्तेचा ठाकरे कुटुंबाशी संबंध असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
ठाकरे कुटुंबाने आपल्या व्यवसाय म्हणून मार्मिक आणि सामना ही दोन प्रिंटिंग प्रकाशने दाखवली आहेत. आपण आदित्य यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्याची मालमत्ता पाहिली तेव्हा त्याची चौकशी केली. त्यावेळी ठाकरे कुटुंबियांच्या मालकीची ही दोन्ही प्रकाशने ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशनद्वारे कधीही लेखा परीक्षणाच्या नियंत्रणाखाली आलेली नाहीत आणि त्यांचे मुद्रण किती प्रमाणात होते याची कोणालाही महिती नाही असा दावा भिडे यांनी केला आहे.