
महाराष्ट्रात धुमाकूळ उडवणारा पक्ष भाजपात विलीन होणार?
माजी मुख्यमंत्र्यांचा पक्ष भाजपात विलीन होणार, हालचाली वाढल्या, कोणाचा विरोध कोणाचा पाठिंबा
हैद्राबाद – तेलंगाणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा पक्ष भारत राष्ट्र समिती हा भाजपात विलीन होणार असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. राव यांच्या कन्या आणि आमदार के. कविता यांनी हा गाैप्यस्फोट केला आहे.
कविता यांनी अलीकडेच वडील व पक्षप्रमुख केसीआर यांना एक पत्र लिहिलं होतं, जे माध्यमांत लीक झालं. त्यानंतर बीआरएसमधील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. कविता यांनी आपल्या भावावरच उघड आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या की, हा डाव केवळ भूतकाळात नव्हता, तर तो अजूनही सुरू आहे.”कविता यांनी आपले बंधू व बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामा राव (केटीआर) यांचे नाव न घेता निशाणा साधला. “माझ्या तुरुंगवासादरम्यान (दिल्ली दारू घोटाळा प्रकरण) माझ्यासमोर भाजपमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, पण मी तो स्पष्टपणे फेटाळला,” असा दावा त्यांनी केला. कविता यांनी भाजपवर टीका करत सांगितले, “भाजप तेलंगणातील संसाधनांवर डोळा ठेवून बसले आहे. त्यांच्यावर अंकुश ठेवण्याऐवजी काहीजण बीआरएसलाच त्यांच्या हाती सोपवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, बीआरएस म्हणजे तेलंगणातील जनतेसाठी श्रीरामरक्षा आहे, आणि मी कोणत्याही विलीनीकरणास कटाक्षाने विरोध केला. असा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान बीआरएस पक्षाने एकेकाळी महाराष्ट्रात सुद्धा धुमाकूळ उडवून दिला होता. पण निवडणूकीच्या आधीच त्यांच्या पक्षाचे महाराष्ट्रातील अस्तिव संपले.
बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समिती हा तेलंगणातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. २००१ मध्ये केसीआर यांनी स्थापन केलेल्या या पक्षाचा मुख्य उद्देश वेगळं तेलंगणा राज्य निर्माण करणे हा होता. केसीआर हे तेलंगाणाचे मुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत. बीआरएस सध्या प्रमुख विरोधी पक्ष म्हणून कार्यरत आहे.