
शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकासआघाडीचे डॉ. अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. मात्र, मतदानाआधी या दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे.’विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरला गेला. पण उमेदवारी अर्ज भरायला मुख्यमंत्री आलेच नाहीत. मी डमी उमेदवार म्हणतो ते उगाच नाहीट, असा टोला लगावत खासदार अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना डिवचलं होतं. यावर प्रत्युत्तर देताना मी डमी नसून डॅडी उमेदवार अशल्याचं आढळराव पाटील म्हणाले आहेत.
जे नेत्यांच्या मनातील पसंतीचे उमेदवार नाहीत ते जनतेच्या पसंतीचे उमेदवार कसे असतील? असं म्हणत अमोल कोल्हेंनी आढळराव पाटल डमी उमेदवार असल्याचा पुनरुच्चार केला होता. मात्र, मी डमी नाही तर डॅडी उमेदवार असल्याचं ठणकावून सांगत आढळराव पाटलांनी कोल्हेंवर हल्लाबोल केला आहे.पुढे बोलताना त्यांनी कोल्हेंवर टिकाही केली. ते म्हणाले, की अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावाला पाणी टंचाईमुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. “निवडुन तो गेलाय…कामं मी करतोय…! दत्तक गाव त्याने घेतलं..पण पाणी मात्र मी देतोय…!” अशा शब्दात आढळराव पाटलांनी कोल्हेंवर हल्लाबोल केला आहे.
शिरूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरला. पुण्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत आढळराव पाटील यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.