
पुणे – दहीहंडीचे डेकोरेशनचे काम पूर्ण करुन घरी जात असलेल्या दोघा भावांना कार नीट चालवता येत नाही का असे म्हणून तिघांनी लाकडी बांबुने बेदम मारहाण केली. त्यात तरुणाच्या डोक्याची कवटी फ्रॅक्चर असून रक्ताच्या गाठी झालेल्या व डाव्या कानातील नस तुटल्याने रक्तस्त्राव होत आहे. तसेच त्यांच्या भावाचा हात दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला आहे.
याबाबत निलेश बाळासाहेब वांजळे (वय ३०) यांनी हॉस्पिटलमधून वारजे माळवाडी पोलीस ठाण्याकडे फिर्याद दिली आहे. वारजे चौकाकडून कर्वेनगरकडे जाणार्या रोडवर बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे डेकोरेशनचा व्यवसाय करतात. दहीहंडीचे डेकोरेशनचे काम पूर्ण करुन तो आपला भाऊ जयदीप कदम (वय २८) यांच्याबरोबर कारने घरी चालले होते. त्यावेळी वारजे चौकाकडून कर्वेनगरकडे जात असताना आंबेडकर चौकाच्या सर्कलजवळ कर्वेनगर चौकाकडून आलेल्या सिल्वर रंगाच्या गाडीने वेगाने येऊन सर्कलजवळ थांबली. त्यामुळे फिर्यादी यांनी आपल्या गाडीचा ब्रेक मारला व त्या गाडीकडे पाहू लागले.
तेव्हा गाडीतून एक जण खाली उतरला व म्हणाला की, ‘काय रे तुला गाडी जमत नाही का’ असे म्हणून तो शिवीगाळ करु लागला. ते खाली उतरल्यावर त्यांच्यातील एकाने लाकडी बांबुने जयदिपच्या हातावर मारहाण केली. तेव्हा तो पळून गेला. लाकडी बांबु घेतलेल्याने फिर्यादी यांच्या डोक्यात डाव्या कानावर, पाठीवर, उजव्या डोळ्यावर मारहाण केली. तेव्हा त्यांच्या तावडीतून सुटून ते लपून बसले. ते निघून गेल्यावर मित्रांना, नातेवाईकांना बोलावले. त्यांनी दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. फिर्यादींच्या डोक्याची कवटी फ्रॅक्चर असून रक्ताच्या गाठी झालेल्या व डाव्या कानातील नस तुटल्याने रक्तस्त्राव होत आहे. तसेच त्यांच्या भावाचा हात दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला आहे.
पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ वारजे पोलीस तपास करीत आहेत.