
वाल्मिक कराडमुळे मंत्री धनंजय मुंडे यांची आमदारकी जाणार?
न्यायालयात याचिका दाखल, धनंजय मुंडेच्या शिफारशीमुळेच कराड या समितीचा अध्यक्ष
मुंबई – संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे रोजच नवीन वादात अडकत आहेत. विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. पण आता धनंजय मुंडे यांच्या आमदारपदालाच आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे मुंडेचा पाय आणखी खोलात गेला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता दोन महिने उलटले आहेत. तरी देखील या निकालाविरोधात आव्हान देऊन याचिका दाखल करण्यात आली आहे. आमदारांच्या विरोधात मुंबई आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. धनंजय मुंडे, सुरेश धस, संजय शिरसाठ, तानाजी सावंत, संजय बनसोडे, हिकमत उढाण, संतोष दानवे, अर्जुन खोतकर, आमदार रमेश कराड, राजू नवघरे, बाबासाहेब पाटील, अमोल पाटील, मंजुळा गावित, नमिता मुंदडा या आमदारांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. दुसरीकडे धनंजय मुंडे व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी माझी साडेतीन कोटी रुपये किमतीची जमीन हडप केल्याचा खळबळजनक आरोप दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी केला आहे. त्यातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समितीच्या अध्यक्षपदी अजूनही वाल्मिक कराड कायम असल्याचं दिसून येत आहे. ही निवड बीड जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरून झाली होती अशी माहिती आहे.दुसरीकडे वाल्मीक कराड याच्यावर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आज नवा आरोप केला. ज्या बँका आणि पतपेढय़ा बुडाल्या त्यातही वाल्मीक कराडचा हात आहे. एका को-ऑपरेटिव्ह बँकेतील अधिकाऱयांना दमदाटी करून कराडने २ कोटींची डिफेंडर घेतली, असे धस म्हणाले आहेत.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग या गावातील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, त्याचा सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा आरोप होत आहे. त्यात आता मामी देखील विरोधात गेल्याने मुंडे यांचे आमदारपद आणि मंत्रीपद धोक्यात आले आहे.