
‘या’ आमदारांमुळे अजित पवारांना मोठा धक्का
अजित पवारांचा डाव एका झटक्यात धुळीला, प्रयत्नांना खीळ, नेमके काय घडले?
मुंबई – अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेतील पराभवातून धडा घेत विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केली. त्यामुळे अजित पवार यांनी पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले होते, पण काही आमदारांमुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा होता. दोन वर्षांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला होता. पक्षात फूट पडल्यावर अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचा निर्धार केला होता. महाराष्ट्रातील चांगल्या कामगिरीमुळे राष्ट्रीय दर्जा मिळण्याची शक्यता वाढली होती, पण आता अजित पवार यांना जोरदार धक्का बसला आहे. नागालँडमधील राष्ट्रवादीच्या सात आमदारांनी पक्षांतर केल्याने राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळवण्यासाठी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी मागील २ वर्षांपासून केलेले प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रावादीचे सात आमदार मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. यामुळे सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचं सरकार अजून मजबूत झालं आहे. पण अजित पवार यांचा मात्र अपेक्षाभंग झाला आहे. सात आमदारांसोबत दोन महिन्यांपूर्वी एक बैठक झाली होती. यावेळी आमदारांनी ‘आमचे काम होत नाहीये, आम्हाला समस्या येत आहेत. आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. म्हणून, त्यांनी सत्ताधारी एनडीडीपीमध्ये काम करणे निवडले,” असं अजित पवार नागालँडमधील पक्षफुटीबद्दल म्हणाले आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये चार राज्यांमध्ये वैध मतांच्या किमान सहा टक्के मते, चार राज्यांमध्ये पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा, तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण जागांपैकी दोन टक्के जागा जिंकणे आवश्यक असे राष्ट्रीय पक्ष दर्जाचे निकष आहेत.