
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा संपला?
एकनाथ शिंदे अजित पवारांच्या वादात भाजपाची माघार, नाराजी टाळण्यासाठी मोठा निर्णय, समीकरण बदलणार?
मुंबई – महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होऊन सहा महिन्यापेकगचा जास्त कालावधी झाला आहे. पण अजूनही नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. पण आता लवकरच हा तिढा सुटण्याची शक्यता असून यावर तोडगा निघाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महायुती सरकार स्थापनेनंतर रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या निर्णयावर शिवसेनेने तीव्र आक्षेप घेत मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली होती. परिणामी, दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. रायगडमधील पालकमंत्री पदासाठी तटकरे आणि गोगावले यांच्यात संघर्ष असून नाशिकसाठी महाजन आणि भुसे यांच्यात चढाओढ आहे. पण आता भुजबळ यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे तेही दावेदार होते. आता काही महिन्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्यामुळे यावर तोडगा काढण्याची मागणी होत होती. आता शिवसेनेने रायगडवर दावा कायम ठेवत नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला देण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ हे नाशिकचे ज्येष्ठ आणि प्रभावी नेते असल्याने, गिरीश महाजन यांच्या तुलनेत अधिक प्रभावी पर्याय म्हणून त्यांची नावे पुढे येत आहेत. आता यावर अधिकृत तोडगा कधी निघणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
“राष्ट्रवादीला नाशिक जिल्हा आम्ही सोडायला तयार आहोत, पण रायगडवर आमचाच दावा राहील. एकनाथ शिंदे साहेब यावर योग्य तो निर्णय घेतील.” असे भरत गोगावले यांनी म्हटले आहे. यावर अद्याप भाजपाने प्रतिक्रिया दिलेली नाही.