
“माझा लढा मराठ्यांच्या लेकी-बाळींसाठी, फडणवीस मूळावर उठलेत का?”; मनोज जरांगे पाटलांचा शिंदे-फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल!
“मी ही झुंज कोणासाठी देतोय? सर्व पक्षांतील मराठ्यांच्या लेकी-बाळींचे वाटोळे करायला निघाले आहेत. सख्ख्या आणि चुलत भावांचे जात प्रमाणपत्र थेट रद्द केले जात आहे. फडणवीस साहेब, बावनकुळेंच्या माध्यमातून तुम्ही मराठ्यांच्या मूळावर का उठला आहात?” असा थेट आणि आक्रमक सवाल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. जातीचे प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या मुद्द्यावरून जरांगे पाटलांनी थेट कागदपत्रे दाखवत सरकारवर घणाघाती टीका केली.

“शिंदे समितीने शोधलेल्या ५८ लाख नोंदी द्यायच्या नाहीत!”

मनोज जरांगे पाटलांनी जात पडताळणी समितीच्या निर्णयावर तीव्र संताप व्यक्त केला. जात पडताळणी समितीचा हा निर्णय आहे. दुसऱ्याच दिवशी प्रमाणपत्र कसं रद्द होतं? शिंदे समितीने रक्ताच्या नात्यांतील शोधलेल्या मूळ (ओरिजिनल) नोंदी कशा रद्द होऊ शकतात? यांना मराठ्यांना मिळालेल्या ५८ लाख नोंदी द्यायचेच नाहीत.जरांगे पाटील मराठ्यांना पक्के आणि टिकाऊ आरक्षण द्यायला निघाले आहेत, म्हणून मराठा समाजात जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

“मी वर्षभरात कधीच टीका केली नव्हती, पण…”
गेल्या वर्षभरातील आपल्या भूमिकेचा संदर्भ देत जरांगे पाटील म्हणाले “मी वर्षभरात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर कधीही टीका केली नाही. मला वाटले होते की गरीबांचे कल्याण होईल. मी कधीही राजकीय ढवळाढवळ केली नाही. मध्ये विखे पाटील पडले, लाड भाऊ पडले, तरी मी एका शब्दाने कोणाला दुखावले नाही; कारण मला फक्त गरीबांचे भले करायचे होते. पण यांच्या डोक्यात मात्र वेगळेच शिजत आहे.”
– मनोज जरांगे पाटील
“मराठ्यांनो एक व्हा, राजकारण नंतर करू!”
बावनकुळे आणि फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत जरांगे यांनी मराठ्यांच्या नोंदी रद्द न करण्याचे आवाहन केले. तसेच, “मराठा समाजाने सध्या राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे, राजकारण आपण नंतरही करू शकतो,” अशी कळकळीची हाक त्यांनी संपूर्ण मराठा समाजाला दिली आहे.

