
“आज आम्ही समाज म्हणून एकत्र आलोय ते फक्त माझ्या मुलीसाठी नाही, तर अशा नराधमांना धडा शिकवण्यासाठी! जिथे सावरकरांनी विदेशी कपड्यांची होळी केली, तिथे अशा नराधमांची होळी झाली पाहिजे,” अशा शब्दांत नसरापूर येथील चिमुकलीच्या वडिलांनी आपला संताप व्यक्त केला. पुण्यात काल या पीडितेच्या न्यायासाठी काढण्यात आलेल्या मूक मोर्चाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे.

नेमकी घटना काय?

पुण्यातील नसरापूर येथे १ मे रोजी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. एका ६५ वर्षीय नराधमाने घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला.एवढ्यावरच न थांबता त्याने चिमुकलीची दगडाने ठेचून हत्या केली आणि तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला.
मुलगी बेपत्ता झाल्यावर सीसीटीव्ही तपासले असता, आरोपी तिला घेऊन जाताना दिसला आणि हा धक्कादायक प्रकार उघड झाला.

“असे नराधम दिसतील तिथेच त्यांना शिक्षा करा!”
मोर्चामध्ये सहभागी झालेल्या पीडित पित्याने सरकार आणि न्यायव्यवस्थेला कळकळीचे आवाहन केले. ते म्हणाले “हे नराधम जिथे दिसतील तिथेच त्यांना शिक्षा व्हायला हवी, तरच अशा घटनांना आळा बसेल. आज आम्ही शांततेत मोर्चा काढला आहे, पण सरकारने ही शांतता हिंसेत बदलू नये याची काळजी घ्यावी आणि कठोरात कठोर कायदा करावा.”
आरोपीचा निर्लज्जपणा; कोर्टात गुन्हा नाकारला!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नराधमाला आपल्या कृत्याचा थोडाही पश्चाताप नाही. यापूर्वीही त्याने दोनदा असे कृत्य केले होते, मात्र पुराव्याअभावी तो सुटला होता.यावेळी त्याला पोलीस कोठडीत असताना ग्रामस्थांनी चोप दिला, तरीही त्याने कोर्टात “मी काहीच चुकीचे केले नाही” असा दावा केला आहे. आता या विकृत आरोपीला केवळ आणि केवळ फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी मागणी संपूर्ण राज्यातून होत आहे.पोलिस प्रशासन आणि सरकार उत्तम सहकार्य करत असल्याची भावना वडिलांनी व्यक्त केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ मे रोजी या प्रकरणाचे दोषारोपपत्र दाखल होणार आहे.हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर फासावर लटकवावे, अशी विनंती पीडित कुटुंबाने केली आहे.

