
लोणी काळभोर प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे | महाराष्ट्र शासनाने नव्याने सुरू केलेल्या महारती पोर्टल तसेच ग्रामपंचायत स्तरावरील आणि महाविद्यालयीन स्तरावरील आयडी तातडीने बंद करण्याच्या निर्णयाविरोधात राज्यातील महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र व सीएससी केंद्र चालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यासंदर्भात लोणी काळभोर येथील अप्पर तहसील कार्यालयात तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, प्रशासनाने सुरू केलेले नविन महारती पोर्टल हे नागरिकांच्या सोयीसाठी असल्याचे सांगितले जात असले, तरी राज्यात आधीपासूनच आपले सरकार पोर्टल कार्यरत आहे. तसेच ग्रामपंचायत व महाविद्यालयीन स्तरावर आयडी सुविधा उपलब्ध असताना नव्याने पोर्टल सुरू करून आयडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने राज्यातील हजारो महा ई सेवा केंद्र चालकांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार आहे.

राज्यातील लाखो सुशिक्षित युवकांनी महा ई सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र आणि सीएससी केंद्रांच्या माध्यमातून स्वतःचा रोजगार निर्माण केला असून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. शासनाच्या या निर्णयामुळे बेरोजगारी वाढण्याची शक्यता असून अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडतील, अशी भीती केंद्र चालकांनी व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर तांत्रिक व आर्थिक समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व महा ई सेवा केंद्र चालकांनी ४ जुलै २०२६ पासून मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आवश्यक असल्यास आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.


